Manda-Mhatre-Ganesh-Naik
Manda-Mhatre-Ganesh-Naik Sarkarnama
मुंबई

'गणेश नाईकांवर टीका करण्याची संधी मंदा म्हात्रेनी सोडली नाही'

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांचे समर्थक असलेले भाजपाचे 9 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार आहेत. यावरून भाजपा आमदार मंदा म्हात्रे (Manda-Mhatre) यांनी नाईकांना अप्रत्यतक्ष टोला लगावला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपात (BJP) आलेले आयाराम आता पुन्हा आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात असल्याची टीका म्हात्रे यांनी केली आहे.

मंदा म्हात्रे म्हणाल्या, "2014 साली भाजपची सत्ता आली त्यानंतर 2019 ला भाजपची सत्ता येईल आणि आपण महापौर, उपमहापौर होऊ किंवा स्थायीचे चेअरमन पद मिळतील. मात्र, प्रभाग रचनेमुळे त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे ते परत वापस जात आहेत. मात्र, भाजपला यामुळे काही फरक पडत नाही. कारण ते मुळात भाजपचे नव्हते. भाजपचे कट्टर कार्यकर्ते हे गेल्या आठ वर्षापासुन माझ्या सोबत असून एकाही कार्यकर्ता व नगरसेवक सोडून गेला नाही."

आता पर्यंत भाजपात आलेले 12 पेक्षा अधिक आयाराम गेले असून उर्वरितदेखील जातील. मात्र स्वार्थासाठी आपल्या नेत्यांसोबत आलेले नगरसेवक स्वार्थ साध्य न झाल्याने ते जात असल्याचा टोला म्हात्रे यांनी अप्रत्यक्षपणे नाईकांना लगावला आहे.

दरम्यान, शिवकृपा सहकारी पतपेढीच्या शिवकृपा भवन या अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी (ता.14 फेब्रुवारी) नवी मुंबईचा दौरा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात गेलेले नाईकांना जोरदार धक्का बसला आहे. नाईकांच्या कट्टर समर्थकांनी काल (ता. १५ फेब्रुवारी) सकाळी पवार यांची भेट घेतली आहे. नाईकांचे उजवे हात समजले जाणारे भाजपचे नेते रवींद्र इथापे आणि प्रदीप गवस यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी भाजपच्या आठ नगरसेवकांची यादीही पवार यांना सोपवली. ते सर्वजण इथापे आणि गवस यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. पूर्वी नाईक हे राष्ट्रवादीत होते, त्यावेळी तो पक्षाचा गड मानला जात होता. मात्र, त्यांच्या पक्ष सोडण्याने पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे. आव्हाड यांच्याकडे नवी मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी असून त्यांनी पक्ष बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसारच आव्हाड यांनी नाईक यांच्या कट्टर समर्थकांनाच गळाला लावले आहे. मात्र, म्हात्रे यांनी मुळचे भाजप आणि आयाराम असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे नाईकांना टोला लगावला आहे. आता यावर नाईक काय उत्तर देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT