MangalPrabhat Lodha Sarkarnama
मुंबई

MangalPrabhat Lodha : आदित्य ठाकरेंना भाजप घेरणार; मंगलप्रभात लोढा थेट वरळीच्या मैदानात!

Jui Jadhav

Mumbai Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करीत आहेत. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने वरळीत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरळी ठाकरेंविरुद्ध भाजपने फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. यातूनच आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजीमहाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी वरळीतील जांभोरी मैदानाची निवड केली आहे. परिणामी भाजपकडून थेट मंगलप्रभात लोढा वरळी विधानसभेत 'इंटरेस्टेड' आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपचा वरळीत हात?

भाजपचे अनेक कार्यक्रम हे विविध ठिकाणी होत असतात, मात्र त्यांचे काही कार्यक्रम हे वरळीतील जांभोरी मैदानावर घेतले गेले. दहीहंडीचा कार्यक्रम, मेळावे, सभा असे अनेक कार्यक्रम जांभोरी मैदानावर पार पडलेले आहेत. आता लोढांच्या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलेले आहे.

मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) हे त्यांचा कार्यक्रम जांभोरी मैदानात घेणार आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी जवळपास सव्वादोन लाख खेळाडूंचा समावेश असणार आहे. येत्या 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली असून, मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. याचेच उद्घाटन जांभोरी मैदानात होणार आहे.

सव्वादोन लाख खेळाडूंची नोंदणी

छत्रपती शिवाजीमहाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात लगोरी, लेझीम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उड्या, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीरसौष्ठव, ढोलताशा या 16 पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धा विविध वजनी गटात व वयोगटात घेण्यात येणार आहेत. आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव व ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी आयोजिण्यात येणार आहेत.

27 गडकिल्ल्यांचे प्रदर्शन

शिवकालीन खेळ स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रातील 27 किल्ल्यांचे प्रदर्शन उभारले जाणार आहे. नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी यांसारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिकेसुद्धा उद्घाटनप्रसंगी सादर केली जाणार आहेत.

रायगडावरून शिवज्योत

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेचे पावित्र्य जपण्यासाठी रायगडावरून शिवज्योतीचे मुंबईमध्ये आगमन होणार आहे. हा क्रीडा महोत्सव मुंबई उपनगरात अंधेरी, बोरिवली, कुर्ला, मुलुंड या चार तालुक्यांमध्ये, तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजिण्यात येणार आहे.

एकूण 20 ठिकाणी स्पर्धा

मल्लखांब, कबड्डी व खो-खो या खेळप्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिमस्तराचे सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर 9 खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा 6 ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 20 मैदाने/सभागृहात या स्पर्धा योजिल्या आहेत. त्यातील अंतिम स्पर्धा या 10 मैदान आणि सभागृहात होणार आहेत. मंत्री लोढा यांनी स्पर्धेत कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी तयारीमध्ये स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करून घेतले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT