Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray On CM Viral Video: मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हिडिओवर राज ठाकरेंनी काढला चिमटा; म्हणाले, पोटातलं ओठावर आणताना...

Ganesh Thombare

Mumbai News: मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही व्हायरल व्हिडिओवरुन सरकारला चिमटा काढला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोडले. यानंतर राज ठाकरे यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देत सरकार यामधून बोध घेईल आणि चॅनेल्सचे माईक सुरु असू शकतात याचे भान ठेवून, पोटातलं ओठावर आणताना यापुढे विचार करेल, अशी आशा बाळगतो, असा चिमटा त्यांनी काढला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये "बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं", अशा आशयाचे वक्तव्य ऐकण्यास मिळाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सारवासारवही केली होती. पण यावरूनच राज ठाकरे यांनी सरकारला सल्ला देत खोचक टोलाही लगावला आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं ?

"मनोज जरांगे पाटील ह्यांचे मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं, ते त्यांनी मागे घेतलं. ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो", असेही राज ठाकरे म्हणाले.

"आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल, ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे", असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

"गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये, चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल, अशी आशा बाळगतो", असे ट्वीट करत राज ठाकरे यांनी सरकारला चिमटा काढला.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT