Mumbai BMC election news : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये दलित आणि आंबेडकरवादी राजकीय पक्षांची निराशाजनक कामगिरी केल्याचं समोर आलं.
राज्यातील सत्तेत सहभाग असलेले रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाची नाचक्की झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने काँग्रेसबरोबर युती केली. यात आंबेडकरांच्या हाती काहीच लागलं नाही.
शिवसेना आणि भाजप युतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या रिपाइंला मुंबईत एकही जागा सोडली नाही. यातून रिपाइंने नाईलाज म्हणून काही कार्यकर्त्यांनी, 14 ठिकाणी पक्षाचे आदेश आणि युतीतील स्थान डावलून आपापल्या स्तरावर निवडणुका लढवल्या; मात्र त्यांना फार यश येऊ शकले नाही.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसबरोबर (Congress) युती केली. आंबेडकर यांच्या वंचितला देखील मुंबईत कोणताच करिष्मा करता आला नाही. काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली; मात्र ती केवळ प्रतीकात्मक होती. प्रत्यक्षात हे दोन पक्ष कधीच एकत्र आले नाहीत.
जागावाटपात ‘वंचित’कडे असलेल्या 62 जागांपैकी त्यांनी 20 जागा परत केल्या. त्यानंतर पाच जागांवर परस्पर उमेदवार उभे केले. काँग्रेसकडे अनेक जागांवर उमेदवारांची वानवा होती. अनेक जागांवर काँग्रेसने छुप्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवारांना मदत केली.
काँग्रेससोबत मुंबईत ‘वंचित’ने आघाडी केली. त्यामध्ये 50जागांवर ‘वंचित’ने आपले उमेदवार उभे केले होते. त्यात वंचितला यश मिळाले नाही, उलट काँग्रेसच्या 24 जागा निवडून आल्या. तब्बल चार प्रभागांमध्ये ‘वंचित’ने शिवसेना, भाजप आणि इतर पक्षाच्या उमेदवारांना मोठी लढत देत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान गाठले, असा ‘वंचित’चे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दावा केला.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने आपले 24हून अधिक उमेदवार उभे केले होते. या पक्षालाही नजरेत भरेल, असे यश अथवा मते मिळू शकली नाहीत. दुसरीकडे काशीरामजी यांचा वारसा सांगत राज्यात प्रत्येक वेळी एकला चलोचा नारा देणाऱ्या बहुजन समाज पक्षाला देखील मुंबईमध्ये कुठेही यश आले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सत्तेतील एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत मुंबईत युती केली होती. या युतीमध्ये रिपब्लिकन सेनेला एकूण पाच ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये धनुष्यबाण चिन्हावरच या उमेदवारांनी ही निवडणूक लढली. यात प्रभाग क्रमांक 118मध्ये तेजस्वी गाडे या उमेदवाराने शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला अटीतटीची लढत दिल्याची दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला.
मुंबई व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःची मतपेढी असलेल्या दलित आणि आंबेडकरवादी पक्षांना कोणतीही प्रभावी कामगिरी बजावता आली नाही. 227 प्रभागापैकी 95प्रभागात अनुसूचित जातीसाठी राखीव जागा होत्या. त्यात महिलांसाठी आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु दलित आणि आंबेडकरी विचार घेऊन कार्यरत एकाही राजकीय पक्षाला, या राखीव प्रभागांमध्ये उमेदवार निवडून आणता आला नाही; मात्र दुसरीकडे यांच्या मताचा लाभ इतर राजकीय पक्षांना झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.