Abhijit Bangar Sarkarnama
मुंबई

Abhijit Bangar News: कळव्यातील स्वच्छता मोहिमेला मनपा आयुक्तांची दांडी अन् राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा!

Pankaj Rodekar

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेची मोठ्या जोमाने घोडदौड सुरू ठेवलेली आहे. आतापर्यंत झालेल्या मोहिमेत फक्त दोन प्रभाग समितीत आयुक्त बांगर यांची दांडी झाली आहे. एक वेळ ते परदेशात असल्याने आणि दुसऱ्यांदा ठाण्यात असताना कळवा परिसरात न गेल्याने ही दांडी झाल्याचे दिसत आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्यातील मध्यंतरी सुरू झालेल्या वादामुळे आयुक्त बांगर यांनी कळव्याकडे पाठ तर फिरवली नाही ना? किंवा आयुक्तांचा राग कळवेकरांवर आहे, की आमदार आव्हाड यांच्यावर आहे. याबाबत आता राजकीय उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईपाठोपाठ ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आदेशानुसार सर्वंकष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत वागळे इस्टेट, कोपरी-नौपाडा, उथळसर, माजीवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि कळवा या प्रभाग समितीत या मोहिमेद्वारे सकाळी 6 वाजल्यापासून मुख्य रस्ते हे झाडून तद्नंतर पाण्याने स्वच्छ करण्यात येतात. रस्त्यावरील दुभाजक हे स्क्रबरच्या साह्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. याशिवाय त्या परिसरातील रस्त्यांबरोबरच शहरातील उद्याने व मोठे नालेदेखील स्वच्छ करण्यात येत आहेत. नाल्यातील गाळ काढला जात आहे.

या मोहिमेला महापालिका आयुक्त स्वतः उपस्थित राहून त्या कामांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या मोहिमेत कोणालाही चालढकलपणा करता येत नाही. मात्र, नुकताच शनिवारी झालेल्या कळवा परिसरातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेला आयुक्तांची दांडी प्रखरतेने जाणवली आणि तो विषय राजकीय वर्तुळात चर्चिला लागला आहे. त्यांनी ही दांडी का मारली, याबाबत तर्कवितर्क वर्तवले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, शिवसेना फुटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले. त्यानंतर महायुतीचे म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यावर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर, शिंदे गटाकडून आव्हाडांना टार्गेट केले जाऊ लागले. त्यातच कळवा- खारीगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल असो किंवा कळवा खाडी उड्डाणपूल तसेच मुंब्रा- शीळ उड्डाणपूल यांच्या उद्घाटनप्रसंगी श्रेयवाद उफाळून आल्याचेही दिसून आले.

त्यातच खासदार शिंदे विरुद्ध आमदार आव्हाड असा वाद दिसून आला. तो वाद अजून धुमसत आहे. याच वादविवादातून आयुक्तांनी सावध पावले टाकून कळवा परिसरात जाणे टाळले की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यापुढे आयुक्त मुंब्रा प्रभाग समितीतही जाणे टाळणार की काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT