MVA - Mahayuti Sarkarnama
मुंबई

MVA News : कोकण पट्ट्यातील जागांसाठी आघाडीची रणनीती ठरली; ठाणे जिल्ह्यासाठी वेगळा प्लॅन

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी, महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सध्या मुंबईमध्ये जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. एकीकडे जागा वाटपाच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे.

त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने कोकण पट्ट्यातील जागांसाठी वेगळी रणनीती आखली आहे. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत बॅकफुटवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील 18 जागांसाठी वेगळा प्लॅन ठरवला आहे. (MVA News)

ठाणे जिल्ह्याची ओळख ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (Eknath Shinde ) बालेकिल्ला अशी राहिली आहे. त्यासोबतच याठिकाणी भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे विधानसभेच्या 18 जागांवर महायुतीपुढे कशापद्धतीने आव्हान उभे करायचे, याची चाचपणी सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षात सुरु आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने जिल्ह्यातील सर्वाधिक जागा लढवून या संघर्षाचे नेतृत्व करावे अशापद्धतीची आखणी आघाडीच्या गोटात सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चार किंवा पाच तर काँग्रेसने तीन जागा लढवाव्यात असे सुत्र ठरण्याची शक्यता आहे. उर्वरीत जवळपास दहा जागांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार उतरविण्याची तयारी केली जात आहे.

त्याचा एक भाग म्हणून महायुतीतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाला. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना धक्का बसत असताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणपट्टीत मात्र युतीला चांगले यश मिळाले. भिवंडीचा अपवाद वगळला कोकणपट्टीतील सहापैकी पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या मावळमध्येही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळाले. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा विधानसभेतही पोषक राहील अशी आशा महायुतीचे नेते बाळगून आहेत. ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 31 जागा असून लोकसभा निवडणुकीत यापैकी 24 जागांवर महायुतीला चांगली आघाडी मिळाली होती.

लोकसभेचे हे गणित मोडून काढण्याचे मोठे आव्हान यावेळी महाविकास आघाडीपुढे आहे. त्यामुळे पालघर, रायगडसह मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील 18 जागांवर महायुतीचा प्रभाव कसा कमी राहील याची व्युहरचना आघाडीच्या गोटात आखली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील तीनपैकी दोन जागांवर महायुतीला यश मिळाले. ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघातील कळवा-मुंब्रा या एकमेव विधानसभा मतदारसंघ वगळला तर उर्वरीत 11 विधानसभा जागांवर महायुतीला मताधिक्य आहे. भिवंडीत मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम या तीन विधानसभा जागांवर महायुतीचे कपील पाटील आघाडीवर राहीले. जिल्ह्यातील 18 पैकी 14 विधानसभा जागांवर मताधिक्य मिळाल्याने महायुतीचा हा गड भेदण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीपुढे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT