Navi Mumbai  Sarkarnama
मुंबई

Navi Mumbai : महाविकास आघाडीत राजकारण तापणार? नाना पटोलेंची नवी मुंबईबाबत मोठी मागणी

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुका काहीशा लांबणीवर पडल्या आहेत. जागा वाटपांचा तिढा सोडण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपपाल्या मित्रपक्षांमध्ये बैठका सुरू आहेत.

महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाचा घोळ मिटला असल्याचा दावा होत, असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेसाठी नवी मुंबईतील दोन्ही जागांवर मागणी करू, असे म्हटले आहे. नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या बैठक झाली. यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नवी मुंबईतील विधानसभा जागासंदर्भात चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही मतदारसंघावर कार्यकर्त्यांनी दावा केला. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, विजय निश्चित आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत या जागा काँग्रेसकडेच हव्यात, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीत लावून धरली. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीतर्फे रविवारी कार्यकर्ता मेळावा झाला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अनिल कौशिक यांनी मंचावरून नवी मुंबईचा आढावा मांडला. नवी मुंबईतील दोन जागांपैकी किमान एक जागा, तरी काँग्रेस पक्षाला लढवण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. यासोबत नवी मुंबईतील अनेक ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीदेखील विधानसभा जागा काँग्रेसच्या 'पंजा' या निशाणीवर लढवण्याची आग्रही मागणी लावून धरली.

यावेळी कार्यकर्त्यांचा विधानसभेबद्दलचा उत्साह आणि निर्धार पाहत नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत नवी मुंबईच्या दोन्ही जागा काँग्रेससाठी मागण्यांचे आश्वासन दिले. "येत्या 27 तारखेपासून 'मविआ'च्या जागा वाटपाबाबत वाटाघाटीसाठी बैठका सुरू होणार असून या बैठकीत नवी मुंबईच्या दोन्ही जागा मागू आणि या जागांसाठी आपले मेरिट सिद्ध करण्याचा प्रयत्न करू", असे आश्वासन पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिले. याचसोबत या जागा निवडून आणण्याची जबाबदारी इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, हे देखील त्यांनी सूचित केले. या कार्यक्रमावेळी जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याणराव काळे यांचा सत्कार करण्यात आला.

पृथ्वीराज चव्हाण यांचाही आग्रही सूर

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मागणीवर आग्रही सूर लावत दोन्ही जागा मिळाल्यास दोन्ही जागा जिंकून दाखवू, असा विश्वास नवी मुंबईतील कार्यकर्त्यांवर दाखवला. तसेच, आघाडीच्या राजकारणात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन पक्षाची भूमिका आग्रहाने मांडू, असे आश्वासन दिले.

महिलांना दोन हजार देऊ

लाडकी बहीण योजना ही काँग्रेसच्या नारी सन्मान योजनेवरून घेतली असून मध्यप्रदेश आणि तेलंगणामध्ये आम्ही या नारी सन्मान आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 2000 रुपये देत आहोत. येत्या निवडणुकीत निवडून आल्यावर ही योजना महाराष्ट्रातही राबवू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.300

कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

नवी मुंबईतील जवळपास 300 कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT