Nana Patole Vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Nana Patole Vs Eknath Shinde : 'विशाळगडावरील दंगल ही सरकार पुरस्कृत' ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

Pradeep Pendhare

Nana Patole On Eknath Shinde and BJP News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय आणि गडाखाली असलेल्या गजापूर गावातील दंगलीवरून मोठं विधान केलं आहे. ही सर्व दंगल सरकार पुरस्कृत होती, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी आपल्या आरोपांचे समर्थन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्यावर केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला आहे. पटोले यांच्या आरोपाचा रोख थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पटोलेंच्या या आरोपावर सत्ताधारी आता कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाना पटोले यांनी विशाळगडावर घडलेला प्रकार आणि गडाखाली असलेल्या गजापूर गावातील दंगलीवर पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. विशाळगडावरील घटनेवरून त्यांनी महायुती सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. 'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत होती, असा आरोप करत नाना पटोले यांनी दाखला देताना सांगितले की, स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर 20 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात, 'विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम' करतो, असे म्हटले होते.

तसेच, 'यानंतर 14 जुलैला अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवून आणल्या गेल्या. स्थानिकांनी 5 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अशी घटना घडू शकते, असे सांगितले होते. 12 जुलै निवेदन देऊन देखील जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी (Police) त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ही दंगल कोणाकडून पुरस्कृत झाली, हे स्पष्ट होते.', असे नाना पटोले यांनी म्हटले.

'नमस्ते सदावत्सले' हे राष्ट्रगीत बनवायचंय? -

RSS च्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार, यावर नाना पटोले यांनी अगोदर कंत्राटी भरती आणि लॅटरल इंट्रीच्या माध्यमातून RSS च्या लोकांची केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भरती चालू आहे, असा आरोप केला. तसेच, या अधिकाऱ्यांच्या मदतीने RSS चा अजेंडा राबवण्याचा सरकारचा डाव आहे. हा निर्णय संविधान बदलण्याचाच एक डाव असू शकतो. असंही पटोले म्हणाले.

तसेच, 'मोदी(Modi) सरकारला संविधानाबरोबर देशाचे 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत देखील बदलायचे आहे. 'नमस्ते सदावत्सले' हे राष्ट्रगीत बनवायचे आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर 1966 साली बंदी घातली होती. पण ती आता मोदी सरकारने 9 जुलै 2024 रोजी एक आदेश काढून उठवली आहे.

भ्रष्टाचाराचे खरे सरदार मोदी -

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारांचे सरदार, अशी टिका केली. यावर नाना पटोले यांनी देशात भ्रष्टाचाऱ्यांचे खरे सरदार कोण असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अशी जळजळीत टीका केली. याचवेळी भाजप सरकारने 2017 मध्ये शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले असल्याची आठवण देखील नाना पटोले यांनी करून दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT