Narayan Rane News Sarkarnama
मुंबई

Narayan Rane News : जरांगेंनी उपोषण मागे घेताच नारायण राणेंचं मराठा आरक्षणाविषयी मोठं विधान; म्हणाले," सरसकट कुणबी दाखला..."

Deepak Kulkarni

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टाई यशस्वी ठरली. त्यांनी गुरुवारी सकाळी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अखेर 17 व्या दिवशी जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारला जेरीस आणलेल्या जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेताच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली. राणे म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्या मागणीला माझा कोणत्याही बाबतीत विरोध नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे सरसकट विचार करण्यापेक्षा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेले याचा सर्वे व्हावा. महाराष्ट्रात जवळपास 38 टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत, ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक पात्रता मिळवता आली नाही, अशा समाजातील वर्गाला आरक्षण देण्यात यावं असं स्पष्ट मत राणे यांनी व्यक्त केले.

राणे म्हणाले, कुठल्याही जातीचं आरक्षण काढावं आणि दुसऱ्या कुणाला द्यावं, या मताचा मी नाही. याचं आरक्षण काढून त्याला द्यावं, असं होता कामा नये. यापूर्वीही 16 टक्के आरक्षण दिलं. घटनेने तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यानुसार आरक्षण देण्यात यावं अशी असेही ते म्हणाले.(Maratha Reservation)

'' मराठा आरक्षणाच्या वेळेला द्वेषाची भावना...''

ज्याला जातींबद्दल, समाजाबद्दल, इतिहासाची जाण आहे, अशाच लोकांनी या विषयावर बोलावं असं मला वाटतं. ज्यांनी मागितलं म्हणून मागणाऱ्यावर राग करणं, हे कुणी करु नये. इतर समाजाच्या नागरिकांना जेव्हा आरक्षण देण्यात आलं तेव्हा मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते. त्यामुळे मराठ्यांनी कुणाला आरक्षण देताना द्वेष केला नाही. आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळेला अशा द्वेषाची भावना असू नये”, अशी महत्त्वाची भूमिका नारायण राणे यांनी मांडली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलां(Manoj jarange Patil) नी उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी ही अनेक वर्ष जुनी आहे. यापूर्वी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता तो सुरुही झाला होता. पण त्यानंतर काही कोर्ट-कचऱ्या झाल्या. त्यानंतर हा निर्णय पुढे चालू राहिला नाही. आरक्षणबद्दल काही लोकांनी टीकाही केली असं राणे म्हणाले.

सरसकट कुणबी दाखले देऊ नका...

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे, अशीही मागणी आहे. माझा कोणत्याही बाबतीत विरोध नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, सरसकट करु नका, हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम 15 (4), 16 (4) याचा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्या मराठा समाजाच्या नागरिकांना आरक्षण द्यावं अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT