Thane News: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानं एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी 'रेल्वेने गेलेल्या, कधीही विमानात न बसलेल्या लोकांना विमानातून परत आणलं', असं वादग्रस्त विधान केल्यामुळे नवा वाद पेटला होता. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पण आता याच म्हस्केंनी भारतीय लष्करानं केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर (Operation Sindoor) अभिमानास्पद पाऊल टाकलं आहे.
ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी बुधवारी(ता.7) सोशल मीडियावरील'X' प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओसह पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय लष्कराचं कौतुक करतानाच दुसरीकडे पाकिस्तानवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. त्यांनी एका 'ऑपरेशन सिंदूर'ने बदला घेऊन देशाची उंचावली मान,अटकेपार पुन्हा एकदा तिरंगा फडकवणार हिंदुस्थान!! अशा आशयाच्या कवितेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी तिन्ही दलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीत देश आपल्यासोबत असल्याची ग्वाहीही खासदार म्हस्के यांनी दिली आहे
विशेष म्हणजे सोशल मीडियावर नरेश म्हस्के यांनी आपल्या कवितेचं वाचन केलं आहे.यात ते म्हणतात, नापाकड्यांनो खबरदार!!खूप सहन केले तुमचे भ्याड हल्ले, पाठीत वार खूप सोसले आजवर तुमचे तोंड दाबून बुक्क्याचे मार, विसरून साऱ्या पडझडी आम्ही, हात पुढे करत राहिलो, कधी मैत्री कधी मदत, सहिष्णुतेचा राग आळवत राहिलो, लक्षात आले नाही तेव्हा संवेदना माणसांना असतात. सैतानाच्या मनात कायम विध्वंसाचे मनसुबे वसतात,अशा काव्य पंक्तितून म्हस्के यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे.
खूप गमावलं आम्ही कायम वाटत राहिलो शांती अमन,आता मात्र आमच्याकडून फक्त काळभैरवाला नमन,तांडव करेल महाकाल आता कश्यपमुनींच्या भूमीवर,उभा ठाकलाय महाबली रावी सिंधूच्या बांधावर,धर्म विचारून तुम्ही आमच्या बांधवांना गोळ्या घातल्या. माणसं,प्राणी मूर्ती विटण्या एवढ्या तुमच्या वृत्ती मातल्या.
त्यानंतर शेवट्या कडव्यात नरेश म्हस्के यांनी आज फक्त थोडक्यात उत्तर दिले आहे पाक्या,येत्या काळात दिसेल नवा हिंदुस्तानी खाक्या असंही म्हटलं आहे.तसेच 'ऑपरेशन सिंदूर'ने बदला घेऊन देशाची उंचावली मान,अटकेपार पुन्हा एकदा तिरंगा फडकवणार हिंदुस्थान!! असे कौतुकोद्गारही त्यांनी भारतीय सेनेबद्दल काढले आहेत.
ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे हे पहलगाम हल्ल्यानंतर तात्काळ काश्मीर येथे जात तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची सोय करत होते. याची माहिती देताना नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानावरुन नवा वाद पेटला होता.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते. याचदरम्यान,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला पोहोचले होते.
याचवरुन काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांमध्ये 45 लोक वर्धा आणि नागपूरचे आहेत, जे तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते,ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते.त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली आहे,असं विधान केल्यामुळे म्हस्के यांच्यावर सडकून टीका झाली होती.
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. 45 लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. त्यांच्या खाण्याचे वांधे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसणार आहेत, असंही नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.