NCP and BJP Sarkarnama
मुंबई

NCP VS BJP Twitter War: शरद पवार-चंद्रशेखर बावनकुळेंवरील टीकेवरून राष्ट्रवादी अन् भाजपात ट्विटर वॉर

Ganesh Thombare

BJP-NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीनंतर भाजपाने पवारांवर टीका केली. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील वादामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये ट्विटर वॉर सुरू झाल्याचे दिसत आहे.

आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन जिंकणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना ज्या नेत्याला त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट द्यायलाही 'लायक' समजले नाही, त्या नेत्याविषयी आपण बोलायची काय गरज?, असं म्हटलं. शरद पवारांचं हे विधान भाजपला चांगलंच झोंबल आणि त्यानंतर मग दोन्ही पक्षात ट्विटर वॉर सुरू झाला.

भाजपाने काय म्हटलं ?

भाजपाने ट्विटद्वारे म्हटलं आहे की, ''आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं जेवढं वय आहे त्याहून अधिक वर्षे शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आहे. आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणं, प्रोत्साहन देणं हे पवारांना माहिती नाही म्हणून ते बावनकुळेंविरोधात बोलले आहेत. हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आम्ही बोलायची गरज नाही. त्यांचे सहकारी अजित पवार, छगन भुजबळ यावर बोलले आहेत.''

याशिवाय ''भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं काम बघून त्यांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष केलं आहे. संघटन सर्वोपरी या धारणेने ते काम करताहेत. शरद पवार आणि विरोधकांना बोलायला मुद्दे नाहीत, त्यामुळे ते आमच्यावर टीका करताहेत पण आम्ही पवार आणि ठाकरे यांना प्रश्न विचारत राहणार. हिंदू धर्म संपविणाऱ्या स्टॅलिनला तुमचं समर्थन आहे का? कंत्राटी भरतीसाठीचा जीआर काढून तशी भरती प्रक्रिया राबविल्याबद्दल आणि नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या तरुण पिढीची फसवणूक केल्याबद्दल तरुणांची माफी कधी मागणार?'' असं म्हणत भाजपाने टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार -

भाजपाने शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर पलटवार करताना राष्ट्रवादीने म्हटले आहे की, “आदरणीय पवार साहेब यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे तितकं बावनकुळे यांचं वय आहे. याची जाण तुम्हाला उशिरा का होईना झाली हे महत्वाचं! फक्त एक राहून गेलं, ते म्हणजे आदरणीय साहेबांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून फोडाफोडीचं राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापण्याची मुळीच राहिलेली नाही. पवार साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांच्या हिताचे जे सर्वसमावेशक निर्णय घेतले त्याची सर तुम्हाला येणार नाही हे महाराष्ट्र जाणतो.''

याचबरोबर ''स्व. यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या राजकीय आदर्शावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जातीय तेढ निर्माण करणं, विकासाऐवजी केवळ धर्माचं राजकारण करणं ही वृत्ती पवार साहेबांनी कधीच जोपासली नाही. आणि हो... तुम्ही कितीही रेटून खोटं बोलून तुमचं कंत्राटी भरतीचं पाप दुसऱ्याच्या माथी टाकण्याचा प्रयत्न करा, महाराष्ट्राला हे चांगलेच माहित आहे की, त्यावेळेसच्या कॅबिनेटमधील मंत्री जे तुमच्यासोबत आता सत्तेत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यास असमर्थ आहात.'' असंही राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

याशिवाय ''आणि बावनकुळेजी...आपल्या संपूर्ण हयातीत आदरणीय पवार साहेबांनी सत्तेच्या स्वार्थासाठी दिल्लीच्या तख्तापुढे गुडघे टेकले नाहीत बरं... तर मतांसाठी धार्मिक राजकारणही केलं नाही. आदरणीय पवार साहेब स्वाभिमानाने ‘महाराष्ट्र धर्म’ पाळणारे आहेत. कारण छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार त्यांच्या आचरणात आहे, १३० कोटी देशवासियांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी वृत्तीचा नव्हे!” अशा शब्दांत राष्ट्रवादीने बावनकुळेंवर टीकास्त्र सोडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT