Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awhad, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदे एकत्र येऊन भाजपला देणार धक्का!

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापू लागले आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) मतभेद चव्हाट्यावर आले होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) हे आमनेसामने आले होते. आता या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला असून, खुद्द आव्हाड यांनीच याची कबुली दिली आहे. यामुळे निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सूत्रे आव्हाडांकडे तर शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडे आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु होते. ठाणे महापालिकेत आघाडी नकोच, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. यावर आव्हाड यांनी शिंदेंना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. याला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले होते महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत होते.

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडी व्हावी, असा सूर व्यक्त करण्यात आला. या बैठकीनंतर आव्हाड म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची सगळ्यांची इच्छा आहे. आघाडीतील घटक पक्षांच्या विरोधात कुणीही वक्तव्ये करू नयेत, असे आपापसात ठरवण्यात आले आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप असून, त्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे.

भाजपच्या विरोधात राज्य पातळीवर एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते लढत आहेत. त्याच धर्तीवर आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात उभे राहावे, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे मनोमिलन गरजेचे असून, सर्वांनी एकमताने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमच्याकडून ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे चर्चा करणार आहेत, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

आघाडीत मतभेद असतात पण ते दूर करून किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे जावे लागते. राज्यात महाविकास आघाडी आहे. आम्ही सुरवातीपासून टीका करणे टाळले होते. समोरून टीका झाल्यानंतर प्रत्युत्तर द्यावे लागते. त्यामुळे सगळ्यांनीच आता सांभाळून बोलावे. आघाडीसाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सामंजस्याची भूमिका असावी, असेही आव्हाड यांनी सांगितले.

ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांत शिवसेनेने एकला चलो रे भूमिका घेतली होती. नवी मुंबई, उल्हासनगर आणि जिल्ह्यातील इतर निवडणुकांसाठी आघाडी न करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतली होती. यावरून ठाण्यात या दोन पक्षांत वाद सुरू झाला होती. यावरून शिंदे आणि आव्हाड हे दोन्ही नेते समोरासमोर आले होता. हा वाद भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकारी चिंतित होते. ठाण्यातील वाद मिटला नाही तरी आम्हाला आघाडी हवी आहे, अशी मागणी शिवसेनेच्या नवी मुंबईतील काही नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचे समोर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT