Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
मुंबई

नवाब मलिकांनी न्यायालयात मागितली बिनशर्त माफी!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर त्यांनी सोमवारी पुन्हा हल्लाबोल केला होता. त्यावरून वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी उच्च न्यायालयात मलिकांनी न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका केली होती.

मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) मलिक यांना वानखेडे यांच्याविषयी बोलणार नाही, असे हमीपत्र दिले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मलिकांकडून वानखेडे यांच्याविषयी एकही ट्विट करण्यात आलेले नाही. तसेच त्यांनी बोलण्याचेही टाळले होते. पण रविवारी ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले होते.

त्याचप्रमाणे मलिकांनी दादर येथील चैत्यभूमीवरही वानखेडे यांना उद्देशून वक्तव्य केलं होतं. त्यावरून ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये मलिकांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करण्यात आला होता. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले होते. त्यावर न्यायालयाने मलिकांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार मलिकांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान, मलिक यांनी ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांच्यामार्फत बाजू मांडली. मी फक्त सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केलेली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी बाजू मलिक यांनी मांडली आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्यावर उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात एक सदस्यीय खंडपीठाने मलिकांना दिलासा दिला आहे. पण न्यायालयाचा हा निर्णय रद्द करण्याची मागणी मलिकांनीच केली होती. या मागणीवर वानखेडे यांनीही आक्षेप घेतलेला नाही.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक यांना आपण व आपल्या कुटुंबीयांबद्दल बोलण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणीही वानखेडे यांनी केली होती. यावर एक सदस्यीय खंडपीठाने मलिक यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घालता येणार नाहीत. परंतु, वानखेडे यांच्याबद्दल जाहीरपणे विधाने करताना मलिक यांनी योग्य काळजी घ्यावी, असा निर्णय देत मलिकांना दिलासा दिला होता.

या निर्णयाविरोधात वानखेडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायाशीध एस. जे. काथेवाला आणि न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी मलिकांच्या वकिलांनी मलिक 9 डिसेंबरपर्यंत वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतंही ट्विट किंवा भाष्य करणार नाहीत, असं न्यायालयात सांगितलं आहे. त्यानंतर मलिकांनी एक सदस्यीन न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायलयात दाखल केली होती.

या याचिकेवर ज्ञानदेव वानखेडे यांनाही कुठला आक्षेप नसल्याचे न्यायालयात सांगितले आहे. मलिकांनी आपल्या याचिकेमध्ये या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एक सदस्यीय खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणीही केली आहे. वानखेडे यांनीही सहमती दर्शवल्याने आता मानहानीचा दावा पुन्हा एकदा एक सदस्यीय खंडपीठासमोर जाणार आहे. तसेच न्यायाधीश ए. जे. काथेवाला आणि न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी एकसदस्यीय खंडपीठाचा आधीचा निर्णय बाजूला ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT