Dhananjay Munde  Sarkarnama
मुंबई

Dhananjay Munde Big Announcement : नव्या कृषिमंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय ; बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : बोगस बियाणे, खतांची विकणाऱ्यांना धडा शिकवण्याचा पवित्रा नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. एकीकडे राज्याच्या कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रकांनी बोगस विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर धडक कारवाई सुरु केली आहे.

याचदरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधात याच अधिवेशनात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल अशी माहिती मुंडे यांनी यावेळी दिली आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोमवारी(ता.१७) मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुंडे म्हणाले, राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलिकडे कारवाई झाली आहे.

बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तर चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल असं मुंडे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यां(Farmer) ना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरून विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बियाणे बोगस निघाले की, शेतकऱ्याची हंगामात धावपळ सुरू होते. बियाणाची उगवण क्षमता नसल्याने त्याची तक्रार करण्यास वेळ लागतो. त्यामुळे ना कंपनीकडून भरपाई मिळते, ना शेतात पीक उगवते. असे विदारक चित्र निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.

राज्याच्या कृषी विभागा (Agriculture Department)कडून सुरु करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे बोगस विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. राज्यात २६९ कृषी सेवा केंद्रांना विक्री करण्यास मनाई केली, तर १३३ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत २० विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे अखेरीस बियाण्यांचे ३८२, ४४६ खते व कीटकनाशकांचे ५ असे एकूण ८३३ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८ जणांना ताकीद देण्यात आली. ११२ प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT