Deepak Kesarkar
Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदेंना काढलेली नोटीस बेकायदेशीर... दीपक केसरकर

Umesh Bambare-Patil

मुंबई : पक्ष नेते पदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काढून टाकल्याची काढलेली नोटीस बेकायदेशीर असून शिवसेनेने ही कारवाई मागे घेतली नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करू, असा इशारा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी दिला आहे.

दीपक केसरकर यांनी आज मुंबई पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काढलेल्या नोटीसीवरून सडतोड उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना पक्षाच्यावतीने पक्ष नेते पदावरून एकनाथ शिंदे यांना काढले असे सांगण्यात आले आहे. याबाबतची काढलेली नोटीस किंवा पत्र हे बेकायदेशीर आहे. त्यांनाही आम्ही याचे उत्तर देणार आहोत. त्यांनी ही कारवाई मागे घेतली नाही, तर आम्हीही कायदेशीर कारवाई करू. शिंदे हे सभागृह नेते असून हे पद वैधानिक आहे.

केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रशासनाचे मुख्य असता सभागृहाचे नेते हे सर्वोच्च पद असते. कुठलाही आमदार जर विधानसभेत भाषण करत असेल त्यावेळी सभागृहाच्या नेत्यांनी प्रवेश केल्यावर काही काळ कामकाज थांबवावे लागते. ते स्थानबध्द होईपर्यंत कामकाज थांबते. एवढे या पदाला महत्व आहे. सभागृहाच्या नेत्यांचा अपमान होतो, त्यावेळी त्यांच्यावर हक्कभंग होतो.

सभागृहाचे कामकाज चांगले चालावे, यासाठी या पदाची निर्मिती असून जेवढे पक्ष सभागृहात आहेत, त्यांचे नेतृत्व सभागृह नेते करतात. त्याला एक दर्जा असतो. पार्लमेंटमध्ये वेगळी प्रथा आहे. ही महाराष्ट्रात आहे. विधानसभा किंवा विधान परिषदेतून निवडून आला तरी तुम्ही सभागृहाचे नेते होता. परंतू मनमोहन सिंग असे पंतप्रधान असे होते, ते राज्यसभेत निवडून आले होते. त्यामुळे पार्लमेंटची प्रथा लक्षात घेऊन त्यांनी दुसऱ्यांना सभागृह नेते म्हणून मान्यता दिली होती. शिवसेनेने ही कृती करायला नको होती, त्यांची कृती त्यांच्याच पक्षाला शोभनिय नाही.

पक्ष नेते पदावरून काढण्याचा निर्णय झाला, त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज केले आहे. याच्याविरोधात न्यायालयात याचिका केली होती, त्यावरही त्यांनी लवकरच सुनावणी घेण्याची मागणी केली होती. ती सुध्दा न्यायालयाने फेटाळली आहे. या सर्व गोष्टी लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत. सध्या शिवसेनेत विविध पदावर कार्यरत कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची मोहिम सुरू आहे. पक्षाचे सदस्य असताना त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे कारण नाही.

प्रतिज्ञापत्र घेतले तरी त्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षात जायला कुठलेही बंधन नाही. एखाद्या माणसाला पक्षात राहायचे असेल तर प्रेमाचे बंधन लगते. शिवबंधन हे शिवसेनेच्या प्रेमाचे बंधन आहे. आजसुध्दा ते आमच्या हातात असून बाळासाहेब ठाकरेंची आठवण म्हणून आम्ही ते हातात बांधले आहे. आम्ही शिवसैनिक असून हे प्रेमाचे बंधन बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना दिले होते. शिवसेनेचा कार्यकर्ता हा वडापाव खाऊन पक्षाचा प्रचार करत असतो. तो वडापाव वीस रूपयात येतो, त्याला शंभर रूपये खर्च करायला लावणे योग्य नाही.

अशा प्रतिज्ञापत्रातून तुमच्यावर बंधन येत नाही. शिवबंधन हे खरे नाते ते प्रेमाचे नाते असून ते अबाधित राहणार आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, उद्धव साहेबांचे कोणतेही स्टेटमेंट आले तर आम्ही त्याला उत्तर देणार नाही. कारण नाती जपण्यात गोडी असते ती किती ताणायची याला मर्यादा असते. शिंदे साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी गतीने काम करायला सुरवात केली आहे. आज पहाटे चार वाजता आले असून ते आमची मिटिंग घेणार आहेत. किती मोठा नेता झाला तरी कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून बाहेर पडत नाहीत.

आनंदाच्या भरात तुम्ही नाचला तरी माझ्यावर आक्षेप येईल. आता आमच्या आमदारांकडून छोटीशी चुक देखील होऊन दिली जाणार नाही. आमची लढाई ही आनंदासाठी नव्हती ती तर कर्तव्याची लढाई होती. ती जिंकल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विकासाची भावना आमची असेल. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतरही कोणतेही सेलिब्रेशन होणार नाही. महाराष्ट्रात विकास घडेल त्यावेळी सेलिब्रेशन करू, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT