Mumbai, 29 June : टीईटी पेपर फुटीप्रकरणावरून विरोधी पक्षांनी आज सरकारला विधानसभेत घेरले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आणलेला स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी टीईटी पेपर फुटीप्रकरणी सरकार विधानसभेत सविस्तर अहवाल सादर करणार आहे, असे सांगितले. पण त्यावर विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे विरोधकांनी सरकारला पहिल्या तासाभरातच घेरण्याचा प्रयत्न केला.
भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्ताव मांडतााना पेपर फुटीचे प्रमाण वाढले असून पेपरफुटीमध्ये महाराष्ट्र आता दोन नंबरवर आलेला आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी महाराष्टातून सात आरोपींना अटक करण्यात आली होती. तुम्ही निवेदन करायला सांगितलं, आम्ही शांत बसलो. आता परीक्षेला २४ तास टीईटीचे पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले, असे सांगितले.
सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून या पेपरफुटीचा थेट संबंध महाराष्ट्र सरकारशी आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत बसलेला आहे. त्यामुळे आजचे कामकाज बाजूला ठेवून टीईटी पेपर फुटीप्रकरणी सभागृहात चर्चा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे, असे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
जाधव यांच्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, पेपर फुटीप्रकरणी आता महाराष्ट्राची बदनामी संपूर्ण भारतात होत आहे. पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र ठरत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्राची पुरती बदनामी झाली आहे. महाराष्ट्रातच वारंवार पेपर फुटीच्या घटना का घडत आहेत. हे रोखण्यामध्ये आणि परीक्षा पारदर्शी पद्धतीने घेण्यात कुठे कमी पडत आहे.
सुमारे सहा लाख शिक्षक या टीईटी परीक्षेची तयारी करतात आणि पेपर फुटतात. या प्रकरणाची पारदर्शी पद्धतीने चौकशी झाली तर हा कोण सावरीकर आहे. कोण आहे हा. क्रिस्टलचं नाव का पुढं येतंय. चौकशीत दोषी सापडतील, पण राज्यात वारंवार पेपर फुटीच्या घटना घडत आहेत. परीक्षार्थींमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, २०१८ मध्येही टीईटी घोटाळ्यात अभिषेक सावरीकर हाच आरोपी होता. त्याने पुढे सत्ताधारी पक्षात सन्मानाने प्रवेश केला. एकीकडे घोटाळे करायचे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळायचं, दुसरीकडे अशाच लोकांना पक्षात प्रवेश द्यायचा, हे काही बरोबर नाही.
ही पेपर फुटी सरकार पुरस्कृत आहे का, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सरकारने आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे. ही कोणाची चूक आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत. पेपरफुटीप्रकरणी अटक केलेले आरोपी हे बाहेरील राज्याशी कनेक्ट आहेत. या पेपरसाठी बाहेरील राज्याची मदत घ्यावी लागते. पेपर फुटी थांबलं पाहिजे. सहा लाख शिक्षकांचा प्रश्न आहे, त्यामुळे कामकाज थांबवून यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ५७ नोटीन दिली नाही म्हणून फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ज्या दिवशी पुरवण्या मागण्या असतात, त्या वेळी आपण स्थगन प्रस्ताव देत नाही, असेही नार्वेकरांनी सांगितले.
विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. टीईटी पेपर फुटीप्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आजच यासंदर्भातील सविस्तर निवेदन सभागृहात करण्यात येईल, असे भूसे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.