Bharati Kamdi
Bharati Kamdi  Sarkarnama
मुंबई

Palghar Lok Sabha News : आगरी सेनेच्या समर्थनासाठी धावाधाव; भारती कामडींनी घेतली 'या' नेत्याची भेट

सरकारनामा ब्युरो

संदीप पंडित

Palghar Lok Sabha News : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे, तर दुसरीकडे उमेदवारांकडून भेटीगाठीवर भर दिला जात आहे.

महाविकास आघाडीच्या (MVA) पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी (Bharti Kamadi) यांनी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी (Rajaram Salvai) यांची भेट घेतली. या भेटीत पालघर जिल्ह्यातील विविध विषयांवर तासभर चर्चा केली. या वेळी आगरी सेनेने आपल्याला समर्थन द्यावे, अशी विनंती भारती कामडी यांनी राजाराम साळवींना केली.

पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई या भागांत आगरी सेनेची ताकद आहे. पालघर जिल्ह्यात आगरी व कोळी समाजात आगरी सेनेची दीड लाखाहून अधिक मते आहेत. त्यामुळे आगरी सेना राजकीय समीकरणांत नेहमीच निर्णायकी भूमिका बजावत आलेली आहे. साहजिकच आगरी सेनेचे आशीर्वाद सर्वच नेते आणि उमेदवारांसाठी महत्त्वाचे मानले जातात. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांनी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांची भेट घेतली.

पालघर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला आगरी-कोळी समाज मागील काही वर्षांत विविध संक्रमणातून जात आहे. येणाऱ्या अनेक प्रकल्पांत त्यांच्या जागा-जमिनी गेल्या आहेत. त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळावा, या प्रकल्पांत इथल्या मूळ समाजाला प्राधान्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

आगरी-कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या व्यवसायावर गंडांतर आणतील, अशा विनाशकारी 'वाढवण बंदरा'सारख्या प्रकल्पांना येथील स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. त्यानंतरही असे प्रकल्प लादून स्थानिकांना नेस्तनाबूत करू पाहत असल्याने आगरी सेना भाजप-शिंदे सरकारविरोधात नाराज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सगळ्या पार्श्वभूमीवर आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी व भारती कामडी यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी बोईसर येथे झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही 'वाढवण बंदरा'सारख्या विनाशकारी प्रकल्पाविरोधातील भूमिका कायम ठेवली होती. किंबहुना येथील स्थानिक समाजाच्या प्रगतीला हातभार लावू शकतील, असे प्रकल्प आणि योजनांचा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यामुळे शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी आणि येथील स्थानिक समजात परस्परांप्रती सहानुभूतीची भावना आहे.

आगरी सेना नेहमीच शिवसेनेसोबत

विकासाच्या भावनेतून आगरी सेना नेहमीच शिवसेनेसोबत राहिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे; आगरी सेनेआधी पालघर जिल्ह्यातील ख्रिस्ती, मुस्लिम समाजही महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. दरम्यान, या भेटीप्रसंगी बोईसर-डहाणू विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेश पाटील व माजी नगरसेवक राजन पाटील उपस्थित होते.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT