NCP News Sarkarnama
मुंबई

BJP Union Ministers Statement : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने केला मोठा दावा...

Vijaykumar Dudhale

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वादावर निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. पक्षाचे नाव, चिन्ह कोणाला मिळणार की चिन्ह गोठविणार, याबाबतची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा दावा केला आहे. ‘शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह बदलण्याची शक्यता आहे,’ असे विधान दानवे यांनी केले आहे. (Possibility of changing NCP's symbol : Raosaheb Danve)

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज (ता. ६ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना फुटीनंतर ज्याप्रमाणे पक्ष आणि चिन्ह शिंदेंना मिळणार असे बोलले गेले, त्याचपद्धतीने राष्ट्रवादीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्ह बदलून आता वॉशिंग मशिन चिन्ह घ्यावे, हे आरोप आमच्यासाठी नवीन नाहीत. आमच्यावर असे आरोप सतत करण्यात आलेले आहेत. आम्हीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आरोप करू शकतो, पण त्यांचे वय आणि त्यांनी या राज्याला दिलेले नेतृत्व पाहता माझ्यासारख्यांनी त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. मला असं वाटतंय की हे राजकीय आरोप आहेत, यात काहीही तथ्य नाही.

चिन्ह आमचं बदलणार नाही, आमचं कमळच चिन्ह राहणार आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह बदलण्याची शक्यता आहे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, मी, दीपक केसरकर आणि अजितदादा हे गेली अनेक वर्षे राजकारणात आहोत. पूर्वी आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो. आता आम्ही राज्यात एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आमच्या भेटीगाठी नव्या नाहीत. केसरकर यांनी काल मला फोन केला होता. तसेच माझ्या संस्थेचंही काम होतं, त्यामुळे मी त्यांना भेटलो.

मी आज अजितदादांनाही भेटलो. मतदारसंघातील काही विषय असतात. त्या विषयांची सोडवणूक करायची असेल तर राज्यातील मंत्र्यांकडे नेहमीच जावं लागतं. केंद्रातील कामं असतील, तर कधी कधी तेही आम्हाला भेटत असतात. त्यातून कामे मार्गी लागतात. सरकारचे दोन मंत्री भेटणं, हे काही नवीन नाही. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, पण अजितदादांची तब्येत खरंच खराब होती. ते आज मला स्पष्टपणे जाणवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्याच्यावर आम्ही भाष्य करणे, योग्य नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT