Raj Thackeray On One Nation One Election .jpg Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray On One Nation One Election: मोदी सरकारचा पुन्हा एकदा धाडसी निर्णय? राज ठाकरे 'वन नेशन, वन इलेक्शन'वर म्हणतात...

Deepak Kulkarni

Mumbai News : मोदी सरकारने 2014 आणि 2019 या दोन टर्ममध्ये नोटाबंदी, कलम 370 हटवणं, राम मंदिर असे मोठे आणि धाडसी निर्णय घेतले होते.आता आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार आणखी एक धडाकेबाज निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.'वन नेशन,वन इलेक्शन'संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) कायदा करण्याच्या तयारीत आहेत.

एनडीएतील सर्व पक्षांचे 'वन नेशन, वन इलेक्शन' पाठिंबा असल्याचे देखील सांगितले जात आहे. याचदरम्यान, आता एनडीए सरकारच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आपल्या नेहमीच्या स्टाइलने वन नेशन, वन इलेक्शन'संदर्भात रोखठोक भाष्य केले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (ता.18) सोशल मीडियावरील X माध्यमावर आपली पोस्ट शेअर केली आहे. त्यात ठाकरे म्हणतात,'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशाप्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी असंही सूचक विधान ठाकरे यांनी केलं आहे.

मध्यावधी निवडणुका लागल्या तर...

बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो...

राज ठाकरे म्हणतात,पण 'एक देश एक निवडणूक' हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील.

इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असा सल्लाही राज ठाकरे यांनी केंद्रातील एनडीए (NDA) सरकारला दिला आहे.

वन नेशन, वन इलेक्शन'संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) कायदा करण्याच्या तयारीत आहेत. एनडीएतील सर्व पक्षांचे 'वन नेशन, वन इलेक्शन' पाठिंबा असल्याचे देखील सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'वन नेशन,वन इलेक्शन'चा दिलेला नारा पूर्ण होणार आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT