Shiv Sena
Shiv Sena Sarkarnama
मुंबई

शिवसेनेची अशीही खेळी; अपक्षांनाही सेना कार्यालयात पुरावा द्यावा लागला!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुरस आहे. प्रामुख्याने शिवसेनेने दुसरे उमेदवार संजय पवार यांच्या विजयासाठी आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली आहे. प्रत्येक मताला महत्व असल्याने शिवसेनेकडून सावधगिरी बाळगली जात आहे. (Rajya Sabha Election News)

घटक पक्ष व अपक्ष आमदारांनी नेमकं कुणाला मतदान केले, याची एक पावती सेना कार्यालयात दाखल करावी लागल्याचे समजते. त्यामाध्यमातून शिवसेनेकडून (Shiv Sena) घटक आणि अपक्ष आमदारांच्या मतांची गोळाबेरीज केली जात आहे. पहिल्या पसंतीची मतं आणि दुसऱ्या पसंतीची मतं कुणाला किती पडणार, याची सर्वच पक्षांकडून आकडेमोडे केली जात आहे.

दरम्यान, अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यसभा निवडणुकीच्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. मतदानाआधी खार येथील निवासस्थानी एकशे एकवेळा हनुमान चालिसा पठण केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. निवडणुकीत भूकंप होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

रवी राणा (Ravi Rana) हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विधान भवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्याकडे हनुमान चालिसाची पुस्तिका होती. मतदानाला जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला. निवडणुकीत भूकंप होणार असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं.

राणा म्हणाले, मी 101 वेळा हनुमान चाळीसा वाचून आलोय. हनुमान चाळीसा मातोश्री समोर म्हटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता विधान भवनात जातोय. आता गुन्हा दाखल होतोय का ते पहातो. उध्दव ठाकरे म्हणताहेत कशमीरमध्ये जाऊन हनुमान चाळीसा वाचा. मातोश्रीबाहेर उध्दव ठाकरे ज्या वेळी हनुमान चाळीसा वाचतील त्यादिवशीा मी कशमीरमध्ये जाऊन वाचेन. ज्यांनी हनुमान चालीसाचा अपमान केला, त्यांचा विनाश होणार आहे.

राष्ट्रवादीची खेळी

भाजपने (BJP) कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आज राज्यसभेसाठी (Rajyasabha) मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा, अशी अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

मतदान कसं होत आहे, याचा अंदाज घेऊन जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शेवटी मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच मतदानासाठीचे डावपेच आखले गेले आणि मतदान केले गेले. कॉंग्रेसने आपले दोन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदान राखून ठेवले होते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मतदान राखून ठेवले होते. त्यांनी सर्वात शेवटी मतदान केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT