Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale : ठाकरे-आंबेडकर एकत्र; रामदास आठवलेंचं मोठं चॅलेंज

शर्मिला वाळुंज

Ramdas Athawale News : राज्यात शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. याच पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठका देखील झाल्या आहेत. पण अद्यापही युतीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केलं असून ठाकरे आंबेडकरांना मोठं चॅंलेंज देखील दिले आहे.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिरात करण्यात आले होते. या अधिवेशनास केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जर एकत्र येत असतील तर त्यांना तो अधिकार आहे. एकत्र यावं पण त्याचा फारसा परिणाम महायुतीवर होणार नाही. कारण फडणवीस यांची बीजेपी आहे, शिंदे यांची शिवसेना आहे आणि माझा आरपीआय आहे. आम्ही सगळे शिवशक्ती भीमशक्ती आणि महायुती स्ट्रॉंग आहोत. मुंबईवर आमचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही त्यासाठी नक्कीच प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहोत.

ज्यांना कोणाला एकत्र यायचं त्यांनी यावं. परंतु आमची ताकद मोठी असून आमच्या ताकदीसमोर त्यांना नमवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आठवले यांनी शिवसेना व वंचित पक्षाला दिला.

टीका करायला हरकत नाही..; आठवलेंकडून अंधारेंचा समाचार

शिवसेना उपनेत्या अंधारे या महाप्रबोधन यात्रेत अनेक नेत्यांचा समाचार घेत आहेत याविषयी मंत्री आठवले म्हणाले, सुषमा अंधारे यांना टीका करण्यासाठी शिवसेना पक्षात आणले आहे. त्या चांगल्या प्रवक्त्या आहेत. संघर्ष समितीत असणाऱ्या नेत्या आहेत. चांगल्या ऍक्टिव्ह आहेत. काही वर्ष आमच्या पक्षात होत्या. सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे त्यामुळे असे नेत्यांना उपनेते पद दिले गेले आहे आणि टीका करण्यामध्ये त्या ऍक्टिव्ह आहेत. टीका करायला हरकत नाही परंतु सारखी टीका करणे योग्य नाही.

राज्यपालांविरोधात असंतोष...

महापुरुषांचे अवमान आणि राज्यपाल यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे यावर मंत्री आठवले म्हणाले, शिवाजी महाराजांविषयी उलट सुलट असे काही बोलता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने समाजकारण राजकारण सगळेच पक्ष करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचे वक्तव्य करणं योग्य नाही. ते आताच्या पिढीचे सुद्धा आदर्श आहेत आणि पुढच्या पिढीचे सुद्धा आदर्श राहणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य कोणी करू नये. राज्यपाल यांच्या विरोधात असंतोष आहे, अनेकांचे मागणी आहे. यांच्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती यांचा आहे त्यांनी तो लवकर घ्यावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT