Ramesh Chennithala Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan : मोदी, चव्हाण अन् अजितदादा...; चेन्नीथलांनी सगळ्यांचाच हिशेब चुकता केला

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : आगामी निवडणुकांबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत सहभागी झालेल्या अशोक चव्हाणांनी अचानकच काँग्रेस सोडली. ते रविवारी दिवसभर आमच्यासोबत होते. मात्र, निर्णयाबाबत त्यांनी कुणाला भणकही लागू दिली नाही. काँग्रेसने त्यांना दोनदा मुख्यमंत्री केले, पक्षात मान-सन्मान दिला. त्यांनी मोठी पदे उपभोगली. पक्षाने त्यांच्यासाठी काय केले नाही, असे म्हणत काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथलांनी ईडी, सीबीआय की इतर कुणाचा दबाव होता का, हे चव्हाणांनी आम्हाला सांगायला हवे होते. आता त्यांना काँग्रेस सोडण्याचे कारण सांगावेच लागेल, असा इशारा दिला.

माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) रविवारी पक्षासह आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांनी चव्हाणांसह भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले, चव्हाण विविध बैठकांत आमच्यासोबत होते. पक्षात त्यांना कुठलाही त्रास नव्हता. पक्षाने त्यांच्यासाठी काय नाही केले. त्यांच्यावर ईडी, सीबीआयचा दबाव होता का? आता ते काहीही न सांगता असे जाऊ शकत नाहीत. त्यांना जाण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल, असे आव्हानच चव्हाणांना केले.

जे लोक चाललेत त्यांना जाऊ द्या. त्यांच्या प्रति कुणालाही सहानुभूती नाही. राजकारणात अशा प्रकारे आयाराम - गयारामांना काहीही स्थान नसते. नेते गेले तरी जनता महाविकास आघाडीसोबत आहे. आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू, राज्यात आम्ही ताकदीने लढू. ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यांच्यासाठी भाजपचे दारवाजे सताड खुले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे, असा टोलाही भाजपला चेन्नीथलांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चेन्नीथला यांनी पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आदर्श घोटाळ्यावर संसदेत आरोप केले होते. आता त्यांचे सर्व पाप धुतले गेले आहेत. भाजप काय वॉशिंग मशीन आहे का. त्यांच्या जाण्याने काँग्रेस ढासळेल असे वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. आता काँग्रेस मजबूत झाली. आगामी निवडणुकांत राज्यात आम्हालाच सर्वात जास्त जागा मिळणार आहेत. राज्यात आमचेच सरकार बनणार आहे. भाजपच्या विरोधात सर्व आकडे असल्यानेच नेत्यांना फोडले जात आहे. त्यांचे सरकार बनवण्याचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असा इशाराही चेन्नीथलांनी भाजपला दिला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT