Ravindra Chavan, Ramdas Kadam  Sarkarnama
मुंबई

Mahayuti News :'...नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही!'; भाजप अन् शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली

शर्मिला वाळुंज

Dombvili News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत तर दुसरीकडे महायुतीमधील भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील दोन घटक पक्षात मात्र आता मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला; पण मुंबई- गोवा महामार्ग 14 वर्षांत झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपचे मंत्री चव्हाण यांना घरचा आहेर दिला.

ही टीका मंत्री चव्हाण यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी युतीधर्म पाळतो याचा अर्थ असा नाही कोणी काही बोलेल. तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला. यामुळे येत्या काळात महायुतीत आता कुस्ती पहायला मिळणार का ? अशी चर्चा होऊ लागली आहे.

ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरेंपासून ते भाजप नेत्यांपर्यंत अनेकांचा त्यांनी समाचार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.

प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला; पण मुंबई- गोवा महामार्ग 14 वर्षांत झाला नाही. याचे दुःख वाटत आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असे म्हणत महायुतीला 'घरचा आहेर' दिला.

त्यामुळे भाजप गोटात नाराजी व्यक्त होत आहे. शिंदे गटाच्या या टीकेला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खरमरीत उत्तर दिले आहे, या संदर्भातला प्रश्न तो अडाणी माणूस आहे हे माझं मत आहे. नॅशनल हायवे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे रामदास कदम यांच्या बाजूला बसणारे व टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असतील, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

मला कोणावर टीका करायला आवडत नाही. मात्र, त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीमधील सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले आहेत. त्यांच्या मुलाला हजारो कोटी रुपये निधी दिला. त्यामुळे त्यांनी माझे आभार मानले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

पंधरा वर्षे ते मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. त्यावेळेस काय काम केले. मला बोलायला खूप काही येते, कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येते ते दाखवतो. त्यावेळेला कोणी वाचवायला राहणार नाही. मात्र युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही कोणीही काही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ, असे होणार नाही हे लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे खरमरीत प्रत्युत्तर चव्हाण यांनी दिले. दरम्यान, मुंबई-गोव्याच्या रस्त्यावरून महायुतीमधील दोन घटक पक्षात मात्र आता मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT