Sachin Ahir Sarkarnama
मुंबई

Sachin Ahir : ‘त्या’ जबाबदारीचं गिफ्ट सचिन अहिरांना दिलं असावं : उपसभापतिपदाबाबत शिंदेसेनेच्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

Abdul Sattar Statement : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी 'ऑपरेशन टायगर'मध्ये सचिन अहीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला. त्याच कामामुळे त्यांना विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 30 June : आमदार सचिन अहीर यांनी या मूव्हमेंटमध्ये (ऑपरेशन टायगर) जे काम केले. कदाचित या सर्व कामांची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडली असेल म्हणूनच त्यांना विधान परिषदेचे उपसभातिपद दिलं असावं, असा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा शिवेसना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहीर यांनी आज शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार सत्तार यांनी वरील दावा केला आहे.

ते म्हणाले, मुंबईत सचिन अहिरसारखा योद्धा आमच्यासोबत असणं फायद्याचं ठरणार आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्तेमुळे काम करण्याची संधी मिळते. सचिन अहीर यांच्या उपसभापतिपदामुळे एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या राजकारणात एक आगळी वेगळी ओळख निर्माण होईल. मुंबईच्या राजकारणावर त्यांची पकड निर्माण होईल, यासाठीच सचिन अहीर यांना उपसभापतिपदाची संधी देण्यात आली असावी.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा उठाव करण्यात आला होता, त्या वेळी नियोजनाची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आले होती, त्याच्यात ३३ नंतर जे ७ लोक आले होते, ते सात लोक असेच जबाबदारी देण्यात आलेले होते. जे त्यावेळी गुवाहाटीला आले आणि आज अनेकजण पदावर आहेत. एकनाथ शिंदे जो राजकीय निर्णय घेतात, तो पक्षाच्या हिताचा, मजबुतीकरणाचा असतो, असेही सत्तार यांनी नमूद केले

ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं आहे की ‘हे तर टायटल आहे, पिक्चर अजून बाकी आहे. टप्प्याटप्प्याने जे होईल, त्या पद्धतीने शिवसेना मजबूत करण्याचे काम शिंदे करत आहेत. आणखी काही आमदार फुटतील, पण नक्की आकडा सांगता येणार नाही. आमदारांची संख्या १२ पेक्षा जास्त झाली, त्यावेळी निश्चित परिणाम तुम्हा सगळ्यांना भविष्यात दिसेल.

आमदार फुटीबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चेचा परिणाम येत्या काही दिवसांत तुम्हाला निश्चितपणे दिसेल. भविष्याची लढाई समोर ठेवूनच दुसऱ्या पक्षातील आमदारांना पक्षात घेतले जात आहे. मागच्या वेळी आमची संख्या ४० होती, ती आता ६० झाली आहे. आता ६० चे १०० पेक्षा कमी होणार नाहीत, असं मला वाटतं.

भविष्यात भाजप आणि शिवसेना असे दोनच पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील, असेही भाकीत अब्दुल सत्तार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT