Abu Azmi  Sarkarnama
मुंबई

Samajwadi Party : 'मविआ'त छोट्या पक्षांची नाराजी वाढली; अबू आझमी म्हणाले, 'बैठकांमध्ये छोट्या पक्षांना स्थान का नाही?'

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज शेवटची बैठक होत आहे. कोणच्या वाट्याला किती, याचं चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये छोट्या पक्षांना स्थान नसल्यावरून नाराजी आहे.

ही नाराजी दूर होणार का, तशीच राहणार? हे 'मविआ'च्या बैठकीनंतरच कळेल. डाव्या तसंच कम्युनिस्ट पक्षानं 12 जागांची मागणी केली होती. त्याखालोखाल आता समाजवादी पक्षाने देखील 'मविआ'कडे काही जागांची मागणी केली आहे.

'मविआ'च्या जागा वाटपावर मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. आज जागा वाटपाची ही बैठक शेवटी असेल, असे संकेत शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील तिन्ही पक्षांकडून बऱ्याच जागा वाटपावर सहमती झाली आहे. त्यामुळे लवकरच जागा वाटप स्पष्ट करू, असे सांगितले.

'मविआ'च्या या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये छोट्या पक्षांना सहभागी करून घेत नसल्याचा नाराजीचा सूर आहे. राज्यातील समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आता ही नाराजी उघड केली आहे. 'मविआ'च्या बैठकांमध्ये छोट्या पक्षांना स्थान का नाही? असा प्रश्न अबू आझमी यांनी केला आहे.

याद्या फायनल होत आहेत...

अबू आझमी म्हणाले, "'मविआ'च्या बैठकांमध्ये काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच नेते सहभागी होत आहेत. इतर छोट्या पक्षांच्या बैठका बाकी आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांना आठवण करून दिली होती. आपल्याला खूप उशीर होतो, असे देखील म्हटले होते. सर्व जण उमेदवारांच्या याद्या फायनल करत आहेत".

सपाला हव्यात 12 जागा

'काँग्रेस लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं समजते. कोणावर राग नाही, राहुल गांधी आणि अखिलेश यादव सध्या काश्मीरमध्ये आहेत. त्यामुळे तिथे त्यांनी चर्चा करावी. आम्ही 12 जागा मागितल्या आहेत. भिवंडीत काँग्रेस जिंकू शकत नाही. मात्र, मीच तिथे निवडूक जिंकू शकतो', असा दावा देखील अबू आझमी यांनी केला आहे.

कम्युनिस्टला हव्यात 12 जागा

समाजवादी पक्षाबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देखील महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी लावून धरली आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे देखील लक्ष लागले आहे. कम्युनिस्ट पक्षाने डहाणू (पालघर), कळवण, नाशिक पश्चिम, दिंडोरी व इगतपुरी (जिल्हा नाशिक), सोलापूर (मध्य), अकोले (अहमदनगर), किनवट (नांदेड), पाथरी (परभणी), माजलगांव (बीड), विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे) इथल्या जागेवर दावा केला आहे. यासंदर्भात मविआ तथा काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर, माजी आमदार व ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर, कामगार नेते डॉ. डी. एल. कऱ्हाड आणि डॉ. अजित नवले यांनी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT