Mumbai News : शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून दिलेल्या पुरस्काराच्या निकषावरून खासदार संजय राऊत आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संमेलनातील आयोजकंच्या दलालीवर घणाघात केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या पुरस्काराच्या पात्र अन् अपात्रच्या निकषाबद्दल बोलणे आता योग्य नाही, अशी साधव प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, "साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरू आहे. दिल्लीत (Delhi) साहित्य संमेलन सुरू असल्याचे सांगितले जाते, परंतु तिथं राजकीय दलाली सुरू आहे. कोणाला कसेही पुरस्कार देत आहे. कोणाचेही राजकीय सत्कार केले जात आहेत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे? आयोजकांना प्रश्न आहे". तुम्ही दिल्लीत दलाली करण्यासाठी आला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करत आहात? कोण आहेत आयोजक? हा भारतीय जनता पक्षाचा, संघाचा एक उपद्व्याप आहे, असा टोला लगावला.
'मराठीची काय सेवा करणार आहात. महाराष्ट्राच्या (Maharashtra) मानेवर पाय ठेवणारी लोकं, तिथं तुम्ही त्यांचा सत्कार करताय. हे कोण करतंय सगळं? यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनाचे मला निमंत्रण आहे. पण मी तिथं जाणार नाही. कारण, ते साहित्य संमेलन नाही. जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे, तो तिथं जाणार नाही', असेही संजय राऊत यांनी म्हटले.
साहित्य संमेलनाला पैशाची कमी पडली असेल, तर आयोजकांनी पैसे गोळा केले असतील, त्यांनी महाराष्ट्रात यायचं, त्यांना महाराष्ट्रानं पैसे दिले असते, असे सांगून मराठी माणूस साहित्यप्रेमी आहे. त्यांनीच वर्गणी करून पैसे दिले असते. मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा व्यक्तिंना सांगून पैसे दिले असते. पण असे पुरस्कार विकले गेले, महादोजी शिंदेंच्या नावानं! ही लोकं मला येऊन सांगतात. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याचे उद्घाटन करणार आहे. त्यांना भरीस घातलं आहे. त्यांनाही पत्र लिहिणार आहे. दलालांचे संमेलन असून, भ्रष्टाचाऱ्यांना गोळा करून संमेलन होत आहे. साहित्याशी याचा काहीही संबंध नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या माध्यमातून आयोजकांनी ठरवलेला आहे. कोणाला पुरस्कार द्यायचा अन् कोणाला नाही, हे आयोजकांची गोष्ट आहे. महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. यात कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, असे खासदार कोल्हे यांनी म्हटले.
पुरस्कारांच्या निकषांवर अमोल कोल्हे यांनी ते मला नेमकं माहीत नाही. दिल्लीत साहित्य संमेलन व्हावं, यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खूप प्रयत्न केले. योगदान लाभलं आहे. त्यादृष्टीतून आयोजकांनी हा सन्मान केला असेल, तर त्यात काही गैर नाही. पण पुरस्काराच्या पात्र अन् अपात्रच्या निकषाबद्दल बोलणे आता योग्य नाही, असे सांगितले.
झाशीच्या राणीसोबत दगा केला, अशा महादजी शिंदेंच्या नावाने एकनाथ शिंदे यांना सत्कार देत आहात, यावर अमोल कोल्हे म्हणाले, "मराठेशाहीमध्ये महादजी शिंदे यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. एखाद्याप्रसंगाकडे बघून इतिहासाच्या खोलात जाणे, हे योग्य नाही. महादजी शिंदेंच्या योगदानाविषयी प्रश्न उपस्थित करणे योग्य ठरत नाही".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.