
Aaditya Thackeray News : मुंबई आणि ठाकरे हे समीकरण संपूर्ण देशाला माहित आहे. हेच मुंबई ठाकरे यांच्या अधिपत्याखालून काढून जिंकण्याचा प्लान भाजप करत आहे. परंतु भाजपला मुंबई जिंकणं किती अवघड आहे, हे आदित्य ठाकरे यांनी 'सकाळ माध्यम समूह'च्या मुंबईतील साम मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात 'कॉफी वुईथ सकाळ' या सदराखाली दिलेल्या मुलाखतीतून समोर आले आहे.
मुंबई महापालिकेसह(BMC) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत त्याची एक झलक म्हणजे मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन घेतलेली भेट! भाजपच्या नेत्यांच्या अशाच गाठीभेटी पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.
यातून भाजपला(BJP) मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत काबीज करायचीच, हेच दिसते. मुंबई महापालिकेसाठी भाजप भविष्यात आणखीन वेगवेगळे राजकीय डावपेच करणार यात काही शंका नाही. परंतु ही महापालिका जिंकणे भाजपला अगदी सोपे आहे, असे वाटत नाही. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो, ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे!
'कॉफी वुईथ सकाळ' मध्ये सहभागी झालेले आदित्य ठाकरे यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आपले किती प्रेम आहे आणि ती नंबर वन राहण्यासाठी आपण किती कष्ट करतो याची गुपित सांगितले. दिवस अन् रात्रभर धावणारी मुंबई ही रात्री अकरा आणि पहाटं पाच वाजेपर्यंत काहीशी शांत असते. याच काळात मुंबईतील विविध ठिकाणी चाललेल्या कामांची प्रत्यक्ष जाऊन आपण पाहणी करतो. आता सध्या मुंबई सुरू असलेल्या विविध विकास कामांवर, अशाच पद्धतीने आपण लक्ष ठेवून असल्याचा दावा, आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिवसभर धावणाऱ्या मुंबईकरांना विकास कामांची पाहणी करत असताना, व्हीआयपीचा अडथळा नको म्हणून, आपण रात्री पाहणी करत असल्याचे अप्रत्यक्षरीत्या या मुलाखतीत सांगून टाकले.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे सुरू असलेल्या आदानीकरणावर देखील हल्लाबोल चढवला. 'धारावी पुर्नविकासच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी ढापल्या जात आहे. कुर्ला डेअरी आणि देवनारचे डपिंग ग्राऊंड दिलं आहे. भविष्यात मुंबईकरांना आदानीकर भरावा लागेल. अर्थसंकल्पात छुपाकर लावला गेला आहे, वीज बील वाढले आहे. सर्वकाही आदानीकडे देऊन टाकण्याचा घाट आहे. त्यांना जगातील नंबर वनचा श्रीमंत व्हायचा आहे होऊ द्या. पण माझ्या शहराला लुटू नका', असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा असल्याचा दावा केला आहे. यांचे अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले सरकार म्हणायचे की, दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू, पण ते खोटं आहे. कचऱ्याची योजना बंद पडली आहे. कोणतेही नियोजन करण्यापूर्वी मुंबईतील अनेक भागातील रस्त्यांचे खोदकाम करून ठेवले आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्टेट लेवलचे अभ्यासक्रम सुरू आहेत. तिथे दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, यावर काम होताना दिसत नाही. एकंदरीत मुंबईचे हाल करणे सुरु आहे".
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "निवडणुका घेत नाहीत. मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या पाच वर्षापासून झालेली नाही. तांत्रिक कारणावर अडकलेले मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याच सरकारने वेठीस धरल्या आहेत. याच काळात त्यांनी किती पक्ष फोडू आणि सगळ्यांना आपल्यात घेऊन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे प्लॅनिंग केले असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.