Sanjay Raut, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : शिंदेंच्या 'ठासून'ला राऊतांचा 'ठासून' पलटवार; म्हणाले, "जनतेने तुमची..."

Jagdish Patil

Mumbai News, 20 June : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी बुधवारी (ता.19 जून) रोजी शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन साजरा केला. वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा तर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून दोन्ही गटाच्या प्रमुखांनी एकमेकांवर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली, आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

शिंदेंच्या याच टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील जनतेने तुमची ठासून मा**ली आहे. त्याला मलम लावत बसा, अशा शब्दात त्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, कालच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं आहे. हे आव्हान दिलं, कारण त्यांनी आमच्याकडून सर्व हिसकावून घेतलं आहे. आमचं नाव, चिन्ह, आमदार-खासदार त्यांनी घेतले, तरीही शिवसेनेने संघर्ष केला. 9 खासदार निवडून आणले. आमच्याकडे नाव, चिन्ह, असतं तर आम्ही 20 ते 22 खासदार निवडून आणले असते.

मोदींना चॅलेंज आहे, ज्यांना चिन्ह दिलय त्यांच्याकडून ते काढून घ्या. आणि त्यांना स्वत:च्या चिन्हावर लढायला सांगा, मग आम्ही दाखवू. तरीही महाराष्ट्र काय आहे हे आम्ही दाखवलं आहे. 31 खासदार मोदींविरोधात दिल्लीला पाठवले आहेत." अशा शब्दात त्यांनी भाजप आणि शिंदेंसेनेवर हल्लाबोल केला.

तसंच, मुख्यमंत्र्यांच्या ठासून आलो या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, या राज्यातील जनतेने त्यांची ठासून मारली आहे. त्याला मलम लावत बसा. चोरलेलं चिन्ह, नाव वापरुन निवडून येणं, याला ठासून नव्हे तर चोरुन येण म्हणतात. हे चिन्ह आणि पक्ष तुमचं नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रुंच्या मदतीने तुम्ही ते चोरलेलं त्याचा काही प्रमाणात फटका बसला.

लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुमची लायकी काय? शिवसेनेची (Shivsena) स्थापना 58 वर्षांपूर्वी झाली, तेव्हा तुम्ही कुठे होता? तुमचा जन्म झाला होता का? शिवसेनेच्या कोणत्या लढ्यात तुम्ही होता. फक्त टेंडर आंदोलनात होता. तुम्ही तुमच्या देवघरात मोदी, शहा आणि निवडणूक आयोगाचा फोटो ठेवून त्यांची पूजा करा. बाळासाहेबांचा फोटो वापरु नका. विधानसभेलाही तुमची ठासून मारु, अशी जहरी टीका राऊतांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा स्ट्राइक रेट वाढला

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं, "मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून विदर्भ आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कधीही बोलताना किंवा कारवाई करताना पाहिला आहे का? अजिबात नाही.

कारण त्यांना 188 जागा जिंकायच्या आहेत. ते फक्त त्यावरच बोलत असतात. ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत. कोणाला किती टक्के मते मिळाली? याचा स्ट्राइक रेट पण त्यांनी काढला आहे. पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा स्ट्राइक रेट वाढलेला आहे, याची चिंता देशाच्या कृषीमंत्र्यांना आणि राज्यातील सरकारला नाही", अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT