Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : PM मोदींचं शरद पवारांवरील वक्तव्य म्हणजे विकृती; संजय राऊतांची बोचरी टीका

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : महाराष्ट्राला आणि देशाला सांगत होते. मी एक पक्ष फोडला आणि त्या पक्षाच्या नेत्यासमोर त्याच्या सर्वोच्च नेत्याची बदनामी करतोय. आणि माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. ते मराठा सामाजाच्या आंदोलनावर बोलले नाहीत. ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलले नाहीत. या राज्यात अनेक विषय आहेत, त्यावर बोलले नाहीत. पण ते फक्त शरद पवार यांच्यावर बोलले. ज्या पवारसाहेबांचा सन्मान या देशाने केला. राज्याने केला, जनतेने केला. त्यांच्यावर टीका करणं ही एक विकृती आहे. आणि याला विकृती म्हणतात. आणि त्या विकृतीचा अंत २०२४ ला होईल, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींनी काय केलं आहे? पवारसाहेब १० वर्षे देशाचे कृषिमंत्री होते. कृषिमंत्री नव्हते तरीही ते शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत राहिले. शरद पवार फक्त कृषिमंत्री नाहीत, तर या क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत. स्वामिनाथन, सुब्रमण्यमही त्यांचा आदर करत होते. देशाच्या कृषी क्रांतीत मोठे योगदान हे शरद पवारांचेही आहे. मोदींच्या सरकारमध्ये १० वर्षांत कितीतरी कृषिमंत्री बदलले. मोदींनी कृषिमंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत उभं केलं. कृषी क्षेत्राबाबत ही तुमची गंभीरता आहे. शरद पवारांचा तुम्हीच पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पवारांचा हा सन्मान करण्यात आला. हे विसरले का तुम्ही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

शरद पवारांनी साहित, कृषी, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या बळावर काम केलं आहे. सरकारच्या मदतीने नाही. तुम्ही किती संस्था उभ्या केल्या आणि सुरू केल्या? पीएम केअर फंड उभारणं हे काही सामाजिक कार्य नाही. पवारसाहेबांच्या सामाजिक संस्थेतून अजूनही हजारो गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत होते. भूकंप असो की कुठली नैसर्गिक आपत्ती, अशा घटनांमध्ये अनाथ झालेल्या शेकडो मुलांना शरद पवार यांच्या संस्थांच्या माध्यमातून नवजीवन दिलं जातं. तुम्ही काय केलं? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शरद पवार आपले गुरू आहेत. त्यांचा बोट धरून राजकारण शिकलो. शरद पवार कृषिमंत्री आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांनी विकासासाठी मोठं सहकार्य केलं आहे. ही मोदींची वक्तव्यं आहेत. मग तुमचा स्मृतिभंश झालेला आहे का? असं असेल तर उपचार करून घ्या. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, हे तुम्हाला शोभत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात येऊन इथल्या नेत्यांची बदनामी करता. जे राजकीय पक्ष आणि संघटना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात, त्यांच्या प्रमुख नेत्यांवर तुम्ही चिखल उडवता? हे योग्य नाही. तेही शिंदे आणि अजित पवारांसमोर, ज्यांना तुम्ही अशी वागणूक देताय, त्यापेक्षा गुलाम बरे, अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT