Shivsena Dasara Melava 2023  Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Dasara Melava : उद्धव ठाकरे शिवतीर्थावर काय बोलणार? संजय राऊत यांनी दिले संकेत

Sachin Fulpagare

Thackeray Group Dasara Melava : मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतीर्थावर थोड्याच वेळात ठाकरे गटाचा दसरा मेळावा सुरू होत आहे. या मेळाव्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर बाण सोडला आहे. शिंदे गटाचा मेळावा हा भाजप पुरस्कृत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवतीर्थावरील दसरा मेळावा म्हणजे ही पक्षाची ५० वर्षांहून अधिक काळापासूनची परंपरा आहे. आता एक-दोन वर्षांपासून शिवसेनेतून फुटलेला गट जो भाजप पुरस्कृत आहे आणि सांगण्यावरून हा मेळावा तिथे घेतला जातोय. शिवसेनेत फूट पाडणं आणि दोन तुकडे करणं हे भाजपचं जुनं स्वप्न होतं. मराठी माणसाची भक्कम एकजूट ही शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांधून दाखवली, ती तोडायची हा भाजपचा हेतू. एक मेळावा आमचा होत असताना दुसरा मेळावा शिवसेनेचा दुसऱ्या ठिकाणी होतोय, हे पाहून आता भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २०२४ साठी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका काय असेल? देशाच्या राजकारणात २०२४ ला शिवसेना कुठे असेल? या विषयीचं आपलं भाष्य नक्की करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी मेळाव्याआधी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष आहे. लाखो लोकांचं, देशातील नागरिकांचं आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात एक दिशादर्शक मार्गदर्शन त्यांचं शिवसैनिकांना , नेत्यांना आणि जनतेला होईल, असं राऊत यांनी सांगितलं.

महाराष्ट्रावर राग, मुंबईवर राग

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप पुन्हा बघायला मिळतील? असा प्रश्न राऊत यांना करण्यात आला. भाजपचं गुजरातमधील राजकारण असंच आहे आणि यालाच आम्ही गुजरात मॉडेल म्हणतो. तोडा, फोडा आणि राज्य करा. प्रादेशिक अस्मिता संपवा. विशेषतः महाराष्ट्रावर यांचा जुना राग आहे. मुंबईवर राग आहे. शिवसेना जी महाराष्ट्राची आणि मुंबई शहराची एक संरक्षक म्हणून कायम उभी राहिली, ती तोडावी हे यांचं स्वप्न होतं. त्याच्यामुळे हा गट तो गट काही फरक पडत नाही. शिवसेनेत असे अनेक गट आले आणि अरबी समुद्रात कायमचे बुडून गेले. ज्यांचा मेळावा होतोय ते आज सत्तेत आहेत. म्हणून त्यांच्या जोर बैठका आणि दंड हे सुरू आहेत. ते सत्तेत नसतील तेव्हा त्यांना ओहोटी लागेल ती पाहा. सर्व नद्या ज्याप्रमाणे समुद्रात मिळतात तसे जे फुटलेले गट आहेत, जे भाजपने फोडलेत. ते भाजपच्याच नद्या नाल्यांमध्ये विलीन होतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तुमच्या निष्ठा (शिंदे गट) या भाजपच्या चरणाशी विलीन झाल्या आहेत. हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न कधीच नव्हतं. तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्या स्वागताचे ज्या प्रकारे झेंडे फडकवताय, ही शिवसेना नाही. शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची आणि अस्मितेची संघटना बाळासाहेबांनी बांधली. कुणाचं मांडलिकत्व शिवसेने स्वीकारलं नाही. आम्ही एका आघाडीमध्ये आहोत, पण ही देशाची आणि महाराष्ट्राची गरज आहे. भाजपने देशातील लोकशाही, संविधान, मानवता आणि स्वातंत्र्य हे नष्ट करायला घेतलं आहे. त्याविरोधात आम्ही भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलो आहोत. देश संकटात असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांच्या आसनाखालीच तुम्ही (शिंदे गट ) चिरडले जाणार आहात. ही ढोंगंसोंगं बंद करा. बाळासाहेबांची खुर्ची, चपला ठेवता. आणि बाळासाहेबांची तुम्हाला एवढीच भक्ती असती तर तुम्ही शिवसेनेत फूट पाडून भाजपच्या नाडीला स्वतःला फास लावून घेतला नसता. तुम्ही या राज्याचं नुकसान केलंय. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नुकसान करता. गेल्या वर्षी त्यांचा मेळावा झाला आणि आता होतोय, पण तिसऱ्या आणि चौथ्या मेळाव्यात त्यांची (शिंदे गट) खरी ताकद दिसेल, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT