deepak kesarkar sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : “आदित्य अन् रश्मी ठाकरे पंतप्रधानांना भेटले”, केसरकरांचा दावा अन् राऊतांनी दिलं आव्हान; म्हणाले...

Akshay Sabale

आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची भेट घेतली, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी केला होता. त्यामुळे ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, पण केसरकरांचा दावा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी खोडून काढत जोरदार 'प्रहार' केला आहे. तसेच, “आम्ही कुणाला भेटणार नाही,” असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

दीपक केसरकर काय म्हणाले?

“ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपबरोबर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही वृत्तानुसार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची भेट घेतली आहे. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं नाही. शिवसैनिकांनी आतातरी डोळे उघडले पाहिजेत. महायुती होणार होती. उद्धव ठाकरे दिल्लीत तसं ठरवूनही आले होते. पण, त्यांनी शब्द फिरवला. दोन वेळा शब्द फिरवल्यानंतर त्यांना आता जवळ येऊन द्यायचे की नाही, हा निर्णय आता पंतप्रधान मोदींनी घ्यावा,” असं दीपक केसरकरांनी ( Deepak Kesarkar ) म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

“‘पीएमओ’ कार्यालयानं खुलासा करावा”

यावर संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “केसरकरांना काय कामधंदा नाही. ते सैरभैर झाले आहेत. केसरकर मोदी, भाजप, स्वयंसेवक संघाचे गुलाम झाले आहेत. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असेल, तर ‘पीएमओ’ कार्यालयानं याचा खुलासा करावा. पण, पंतप्रधानांची भेट का घ्यायची? आम्ही कुणाला भेटणार नाही.”

“...तर निवडणुकीला उभे राहावं”

“केसरकर हे सावंतवाडीतील मोती तलावावरील डोमकावळा आहेत. केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून यावं. हिंमत असेल, तर निवडणुकीला उभे राहावं,” असं आव्हान राऊतांनी केसरकरांना दिलं आहे.

“शरद पवारांबाबतचं विधान महाराष्ट्राचा अपमान”

‘शरद पवारांना महाराष्ट्राची जनता 50 वर्षांपासून सहन करतेय,’ असं विधान गृहमंत्री अमित शाहांनी केलं होतं. यावर राऊतांनी म्हटलं, “हे विधान महाराष्ट्राचा अपमान आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल यांना शरद पवारांनी सहन केलं. अजित पवार, मुश्रीफ आणि पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पण, ते भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन तुमच्याबरोबर आले आहेत. ते ओझं स्वीकारून तुम्ही सहन करताय, याबद्दल आम्ही अमित शाहांचे आभारी आहोत.”

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT