Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : मी बेसावध राहिलो; पण काँग्रेसची दुसऱ्या फेरीची मतं समान वाटायला हवी होती; पराभवानंतर जयंत पाटलांची खंत

Vijaykumar Dudhale

Mumbai, 13 July : विधान परिषदेत निवडणुकीत मी बेसावध राहिलो, त्यामुळे आमचा पराभव झाला. असं वाटलं की यापेक्षा आपण काय करू शकत नाही, आपली ताकद कमी आहे. पराभवामुळे आम्ही नाराज किंवा निराश नाही. पण, काँग्रेसची दुसऱ्या फेरीची मतं समान वाटायला हवी होती, अशी खंत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीतील (Vidhan Parishad Election) पराभवानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी दुसऱ्या फेरीच्या मताच्या वाटपाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) उमेदवारांना काँग्रेसची (Congress) दुसऱ्या फेरीची मतं समान वाटली असती तर निकाल वेगळा लागला असता. मला आणखी तीन मतं मिळायला हवी होती. ती मतं मिळाली असती तर मी विजयी झालो असतो.

पराभवानंतर माझी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यासोबत चर्चा झाली नाही. माझ्या पराभवावर काँग्रेसचे नेतृत्वही गंभीरपणे विचार करेल, असा आशावाद जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.

ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत मला पाठिंबा दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार. त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला. दिवसातून तीन तीन वेळा फोन केला. काही लोक फसवतील, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं अखेर कळलं. त्यांनी 70 वर्षे राजकारणात घालवली आहेत. रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून माझ्यासाठी बैठका घेतल्या, हे मी कधीही विसरू शकत नाही. पवारांनी सांगितलेल्या काही गोष्टी नक्की घडल्या आहेत.

विधान परिषदेचा निकाल लागून अजून बारा तासही झाले नाहीत, त्यामुळे मी त्यावर चर्चा करणं योग्य नाही. मी आज शरद पवारांना भेटायला गेलो होतो, पण ते आजारी आहेत. येत्या दोन-चार दिवसांत चर्चा करण्यात येईल. एकतर्फी चर्चा करणं योग्य नाही, असे मला वाटतं, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील मोठे पक्ष अजगरासारखे छोट्या पक्षाला गिळत आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर पाटील म्हणाले, मला तसं वाटत नाही. असे अजगर आम्ही चिक्कार पाहिले आहेत. त्यामुळे काही फरक पडत नाही. आमच्या कामकाजात नक्कीच बदल करायला पाहिजं, असं आम्हाला वाटतंय. आघाडीत कसं काम करता येईल, याबाबत विचार करण्यात येईल. आम्ही आमच्यात बदल करू.

शेकापच्या कार्यकर्त्यांना मी निवडून यावं, असं वाटत होतं. तशा कार्यकर्त्यांचा भावना असतात. मी गेली 25 वर्षे विधीमंडळात काम केले आहे. वंचित, शोषितांचे प्रश्न मांडण्याचे, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचविण्याचे काम केले आहे, त्यामुळे मी सभागृहात नसल्याने माझे विरोधकही हळहळत आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सदाभाऊ कुठं अन्‌ शरद पवार कुठं?

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या पराभवाला सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीका केली होती. पवारांनी जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले, ‘सदाभाऊ खोत कुठे आणि शरद पवार कुठे?, कशाला उगीच चर्चा करता.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT