Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shambhuraj Desai On Thackeray : आजही आम्ही ठाकरेंचा आदरच करतो; शिंदेंच्या मंत्र्यांचं 'मातोश्री'प्रेम!

Jui Jadhav

Shambhuraj Desai On Thackeray : शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली आणि पक्षाचे दोन गट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गट, असे विभाजण झाले. मात्र असं झालं असलं तरी देखील आम्ही ठाकरेंचा आदर करतो आणि त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं टाळतो, असं मत मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांडलं आहे. पक्षातून जरी ते दूर गेले असले तरी देखील आदर आहे, असं देखील त्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आदर करतो -

शिवसेनेत दोन गट झाल्यावर दोन्ही गटांकडून टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोप केले जात होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करतात तर उद्धव ठाकरे हे देखील गद्दार म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर टीका करतात. मात्र आम्ही आजही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना माननीय असं संबोधित करतो. आमची मर्यादा अजूनही आम्ही राखलेली आहे. ठाकरे घराण्याचा आम्हाला आजही आदर आहे. आदित्य ठाकरेंच्या वयाचा माझा मुलगा असला तरी देखील मी त्यांना माननीय म्हणून संबोधित करतो, अशी भावना मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बाळासाहेब ठाकरे केवळ यांच्यामुळे आम्ही आजही त्या नावाचा आदर करतो आणि करत राहू. मात्र आम्ही अजूनही मर्यादा राखून आहोत. जर आम्ही मर्यादा सोडली तर मात्र त्यांच्या कित्येक गोष्टी बाहेर काढू आणि ते यांना सहन होणार नाही, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. मात्र केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ठाकरेंचा आदर्श करतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

मातोश्रीवर खोके पोहोचायचे -

मंत्री दीपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलं होत की, उद्धव ठाकरेंना मी मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये दिले होते. मात्र माझ्याकडे अजून पैसे नसल्याने मला मंत्रीपद नाकारण्यात आलं. यावरुन देखील शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलं आहे. केसरकर साहेब आणि माझे जुने संबंध आहेत. जर त्यांनी हे वक्तव्य केलं असेल तर त्यात तथ्य असेलच. म्हणजे, याचाच अर्थ मातोश्रीवर खोके पोहोचायचे. मला कधी असा अनुभव आला नाही, पण जर ते बोलत असतील तर ते खोटं नसेल, असं देखील पुढे देसाई म्हणाले आहेत.

केसरकर यांनी जे आरोप केले आहेत ते गंभीर आहेत. पक्षात दोन गट झाल्यावर शिंदे गटाला खोके सरकार म्हणून संबोधलं जात आहे. पन्नास खोक्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, आता हे वक्तव्य पुढे आल्याने राजकीय वर्तुळत चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंवर केलेले हे आरोप खरे असतील, असं मत शिंदे गटातील नेत्यांचं आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT