Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : साडेसहा तास चक्क उद्धव ठाकरे विधानभवनात कारण काय?

Jagdish Patil

Mumbai News : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना मंत्रालय आणि विधानभवनात फारसा काळ न थांबणारे आणि न येणारे अशी टीका विरोधकांकडून ओढवून घेणारे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मंगळवारी विधानभवनामध्ये तब्बल सहा ते साडेसहा तास बसून राहिले. विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांचा अर्ज ठाकरेंनी भरला.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे प्रचंड अॅक्टिव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे ठाकरे यांची ताकद वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे आता विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विशेष म्हणजे पहिल्या तासापासून ते रोज विधिमंडळात हजेरी लावत आहेत.

मिलिंद नार्वेकर यांचा विधान परिषदेचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे मंगळवारी विधानभवनाच्या परिसरामध्ये आले होते. या परिसरात ठाकरे सहा ते साडेसहा तास हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. त्यानंतर ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. बंद खोलीत ही चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हान होते. अशा स्थितीत ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या मदतीने आपले वर्चस्व टिकवले ते वाढवले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे साधारण नऊ खासदार निवडून आले.

या विजयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला आत्मविश्वास अधिक वाढवण्याच्या इराद्याने ठाकरे आणि त्यांचे शिवसेना अधिक वेगाने कामाला लागली आहे.

दरम्यान, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर हे निवडून आले आहेत. हा निकाल काही तासांपूर्वी लागला त्यामुळेही ठाकरेंना प्रचंड बळ आल्याचे बोलले जात आहे. याचा सगळा राजकीय फायदा पुढच्या निवडणुकीमध्ये उठवण्यासाठी विधिमंडळात हजेरी लावणं, विधानभवनामध्ये काही नेत्यांच्या गाठीभेटी घेणं या निमित्ताने वातावरण निर्माण करण्याचाही ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT