Uddhav Thakare
Uddhav Thakare sarkarnama
मुंबई

दोन्ही काॅंग्रेसचे तोंड शिवसेनेने शिताफिने दाबले...

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवित्र्याला काडीची किमत न देता महापालिका निवडणुकांसाठीची तीन सदस्यांची प्रभाग पध्दत कायम ठेवलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णयाचा प्रस्ताव राज्यपालांकडे धाडला.

त्यामुळे बहुसदस्यीय प्रभागांचा अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होताच तो जाहीर केला जाईल. परिणामी, ठाकरे यांनी ठरविलेल्या प्रभाग पध्दतीनेच दोन्ही काँग्रेसला निवडणुकांना समोरे जावे लागणार आहे. पुढील दोन दिवसांत नव्या प्रभागांचा अध्यादेश निघेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला लागाम लावण्यासाठी आणि आपले 'वजन' वाढविण्यासाठी दोन सदस्यांच्या प्रभागाला पसंती देत दोन्ही काँग्रेसने प्रभागांच्या निर्णयात बदल करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारच्या बैठकीत मुंबईवगळता इतर शहरांसाठी तीनचा प्रभाग करण्याचा विचार कायम ठेवला.

या निर्णयावरून ठाकरे सरकारमधील घटक पक्षांचा वाद टोकला जाण्याची शक्यता होती. तरीही ठाकरे यांनी आपल्या निर्णयांवर ठाम राहात प्रभागांत कोणताही बदल केला नाही. उलटपक्षी, निवडणूक आयोगाकडून निडणुकीच्या प्रक्रियेला वेग दिल्यानंतर वेळ न घालवता, प्रभागांच्या निर्णयाचा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविला.

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कार्यवाही झाल्यानंतर अध्यादेश काढण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मागील निवडणुकांत याच बहुसदस्यीय प्रभागामुळे आपली पिछेहाट झाली आहे. त्याचा फटका शिवसेनेलाही बसला आहे, तेव्हा पुन्हा तीनचा प्रभाग का, अशी विचारणा करणाऱ्या दोन्ही काँग्रेसला आता ठाकरे यांच्या निर्णयाप्रमाणेच निवडणुका लढव्याया लागणार असल्याचे स्पष्ट आहे. हा निर्णय एकप्रकारे मान्य करीत, या विषयावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बोलणार नसल्याची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.

या प्रभागरचनेला आधी प्रचंड विरोध केलेल्या काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही निवडणुकीची तयारीच करावी लागेल. दरम्यान, ठाकरे सरकारकडून स्पष्ट झालेली भूमिका, निवडणूक आयोगाचा आदेश पाहता महापालिकांच्या पातळीवर प्रभागांच्या हद्दीत बदल करून आता नव्या प्रभागांची रचना केली जात आहे. या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या फ्रेब्रुवारीत या निवडणुका होतील. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तीनचा प्रभाग केल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साह असून, मुंबईवगळता अन्य महापालिकांत गत निवडणूकांप्रमाणे यश मिळविण्याचा विश्वास भाजप नेत्यांमध्ये आहे. मात्र, 'भाजपच्या सोयीची प्रभाग पध्दत करून ठाकरे हे काय साध्य करणार ? असा प्रश्न दोन्ही काॅंग्रेसकडून विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT