Balasaheb Thackeray On BJP Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray On BJP: जेव्हा बाळासाहेबांनी भाजपला म्हटलं...'रक्त पिणारी कमळाबाई'

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Shivaji Park Dasara Melava 2023 : मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांवर शिवसेनेचा व्यापक विस्तार झाला. हिंदुत्वाच्या वाटेवर चालणाऱ्या भाजपलाही राज्यात विस्तार करण्यासाठी सहकाऱ्याची गरज होती, तर शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवरच्या मित्राची आवश्यकता असल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून युतीचा जन्म झाला. वर्ष १९९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजप-युती सरकार सत्तेत आले. विविध मुद्द्यांवरून युतीमध्ये कुरुबुरी व्हायच्या. मात्र, प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुखांच्या संबंधांमुळे सर्व काही शांत व्हायचे. कुरबुरींचा शेवट घटस्फोटापर्यंत कधीच गेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्ही हिंदुस्थान घ्या...आम्हाला महाराष्ट्र द्या

शिवसेनाप्रमुखांचे वाक् बाण जसे काँग्रेस व इतर विरोधकांना घायाळ करत तसेच युतीमधील भाजपही घायाळ होत असे. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जागावाटपावरून नेहमीच कुरुबुरी होत असत. वर्ष १९९४ मध्ये दसऱ्या मेळाव्यात बोलताना बाळसाहेबांनी स्पष्ट केले होते की, आपला झगडा जागांचा नाहीच. दिल्ली ते गल्लीपर्यंत पसरलेला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण आपल्याला जाळायचा आहे. जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभे राहू. आपल्याला मिळून काँग्रेसला गाडायचे आहे. त्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानात तुम्ही राज्य करा, आम्ही फक्त महाराष्ट्र मागतोय.

गोचिडी वृत्ती ठेऊ नका

हिंदुत्वाच्या पायावर शिवसेना भाजप युती उभी असल्याने केवळ हिंदुत्वासाठी तडजोड करत असल्याचे सांगताना बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दांत भाजपला ठणकावले होते. बाळासाहेब म्हणाले होते, हिंदुत्वाचे नुकसान होऊ नये म्हणून नेहमी आम्हीच त्याग करायचा, असे प्रत्येकवेळी होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना जेवढी खोलवर रुजली तेवढी भाजप रुजली नाही. या अगोदर भाजपचे दहा खासदार कधीही निवडून आले नव्हते. युती असल्यामुळे तुमचाही फायदा आहेच. त्यामुळे गोचिडी वृत्ती ठेवू नका. गोचिडी वृत्ती ठेवून रक्त पित असाल तर ते जमणार नाही.

स्वबळावर सत्ता आणाल का ?

या वेळी शिवसैनिकांना उद्देशून बाळासाहेबांनी विचारले होते की, युती तुटली तर स्वबळावर शिवसेनेचे सरकार आणाल का? त्यास प्रतिसाद देताना शिवसैनिकांनी मोठ्या आवेशात 'होय' असा प्रतिसाद बाळासाहेबांना दिला होता.

भाजपला झोंबलं 'कमळाबाई'

शिवसेना आणि भाजपची युती असताना शिवसेनाप्रमुखांनी भाजपचा उल्लेख 'कमळाबाई' असा केला व त्यास मोठी प्रसिद्धी मिळाली. 'कमळाबाई' हे विशेषण भाजपच्या नेत्यांना चांगलेच झोंबले होते. भाजपचे पक्ष चिन्ह कमळ असल्याने व शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना मोठ्या भूमिकेत असल्याने बाळासाहेब भाजपचा 'कमळाबाई' असा उल्लेख करत.

'मी सुप्रिया विरोधात उमेदवार देणार नाही'

शिवसेनाप्रमुखांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले, परंतु व्यक्तिगत जीवनात मैत्रीचे संबंध जोपासणारे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या. यावर बाळासाहेबांनी जाहीर केले की, "मी सुप्रिया विरोधात उमेदवार देणार नाही. कमळाबाईची तुम्ही चिंता करू नका" असे म्हटले होते. त्यानंतर 'सामना'च्या अग्रलेखात भाजपसाठी 'कमळाबाई' हेच विशेषण वापरले जात होते.

संवादाची दरी वाढत गेली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे प्रमोद महाजन या दोघांमुळे युतीचा संसार सुरळीत होता. दोघांच्या निधनाने दोन्ही पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी युतीचा गाडा हाकलला. मात्र, त्यांच्या अपघाती निधनाने संवादाची दरी वाढत गेली आणि तिचा शेवट घटस्फोटापर्यंत गेला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT