Shivsena UBT slams BJP over fake Hindutva, temple demolitions and political hypocrisy Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT vs BJP : 'मोदी काळात भारत गोमांस निर्यात करणारा महत्त्वाचा देश बनला, संघ-भाजप मंदिरे तोडत आहेत आणि भक्त 'नमो नमो'च्या नकली हिंदुत्वात गुंग झालेत...'

Shivsena UBT On BJP Hindutva : 'अयोध्येत राममंदिर उभे राहिले. त्याआधी तेथेही अनेक पुरातन मंदिरे व मठांवर बुलडोझर फिरवले. मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यात अनेक मंदिरे पाडली गेली. हे मंदिर पाडण्याचे काम एखाद्या काँगेसशासित राज्यात घडले असते तर भाजपने रस्त्यावर उतरून हिंदुत्वाच्या नावाने नंगानाच केला असता.'

Jagdish Patil

Mumbai News, 04 Dec : 'नकली हिंदुत्वाचे दुसरे नाव भारतीय जनता पक्ष यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत राममंदिरावर धर्मध्वजा फडकवली तेव्हा देशात हिंदू राष्ट्र निर्माण झाल्याचे शंख भाजप आणि त्याच्या अंधभक्तांनी फुंकले. मात्र सत्य असे आहे की, भाजप काळात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे जेवढे नुकसान झाले.

तेवढे मोगल काळातही झाले नाही', अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. नाशिक तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा तसंच झंडेवाला परिसरात दिल्लीत 1400 वर्षे जुन्या मंदिरावर बुलडोझर चालवल्याच्या घटनांचा संदर्भ देत सामनातून भाजपवर जिव्हारी लागणारी टीका करण्यात आली आहे.

सामनात लिहिलं की, 'आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे तथाकथित हिंदू राष्ट्रवाले हिंदूंच्या पुरातन धर्मस्थळांवर मोगली पद्धतीने बुलडोझर फिरवतात तेव्हा हिंदुत्वासाठी बलिदान दिलेल्या आत्म्यांची काय तडफड होत असेल? झंडेवाला परिसरात म्हणजे दिल्लीत 1400 वर्षे जुन्या मंदिरावर भाजप सरकारने बुलडोझर चालवला.

दिल्लीतील हिंदू समाजाचे हे सगळ्यात जुने श्रद्धास्थान होते. पण येथे प्रखर हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या हिंदुत्वाचे, ‘गौतम अदानी’चे मुख्यालय नव्याने झाले. खुद्द पंतप्रधान कार्यालयातून ‘फेक अदानी देवा’चीच पूजा होत असल्यावर यापेक्षा वेगळे काय होणार? त्याच वेळी संघ मुख्यालयात पार्किंग व्यवस्था नीट व्हावी म्हणून ‘केशवकुंज’च्या सोयीसाठी तेथील पुरातन मंदिरावर व आजूबाजूच्या हिंदू लोकांच्या घरांवरदेखील बुलडोझर कारवाई करण्यात आली.

या मंदिराचा इतिहास पुरातन आहे. हे मंदिर किमान 800 वर्षांचा इतिहास सांगते. 1947 साली देशाच्या विभाजनानंतर बाबा रतननाथ हे पेशावरमधून दिल्लीत आले व त्यांनी या मंदिरात आपला मुक्काम केला. तेव्हापासून हे मंदिर त्यांच्या नावाने ओळखले जाते व फाळणी काळातील विस्थापितांचे हे श्रद्धास्थान बनले.

हे सर्व लोक हिंदुत्ववादी व भाजपचे समर्थक मानले जातात. तरीही ‘संघ’ मंडळाच्या गाड्याघोड्यांच्या पार्किंगसाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानावर बुलडोझर फिरवला गेला. अयोध्येतील मंदिर बाबराने तोडले म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा त्यामुळे समोर आला. बाबराने जितकी मंदिरे तोडली नसतील त्यापेक्षा जास्त मंदिरे व हिंदू धार्मिक स्थळांवर भाजपने बुलडोझर फिरविले,' असा जोरदार हल्लाबोल सामनातून केला आहे.

तर वाराणसीत विकासाच्या नावाखाली 1100 पुरातन मंदिरे तोडण्यात आली, अशा लोकांच्या हाती आज हिंदू धर्मध्वजा आहे. एका बाजूला गाईस गोमाता म्हणायचे, गोमांसाविरुद्ध आंदोलने बडवायची व त्याच वेळी भाजपचे ईशान्येकडील मंत्री गोमांस खातात याचे समर्थन करायचे. भारत हा मोदी काळात गोमांस निर्यात करणारा महत्त्वाचा देश बनला आहे.

भारतातील गोमांसाला जगात मागणी आहे व या गोमांस निर्यातदार कंपन्यांनी भाजपच्या तिजोरीत शेकडो कोटींचे ‘दान’ दिले. गायी कापणाऱ्यांकडून ‘चंदा’ घेणाऱ्यांनी आता धर्मध्वजा फडकवली. अयोध्येत राममंदिर उभे राहिले. त्याआधी तेथेही अनेक पुरातन मंदिरे व मठांवर बुलडोझर फिरवले. मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यात अनेक मंदिरे पाडली गेली.

हे मंदिर पाडण्याचे काम एखाद्या काँगेसशासित राज्यात घडले असते तर भाजपने रस्त्यावर उतरून हिंदुत्वाच्या नावाने नंगानाच केला असता. देशातले साधू वगैरे लोक रस्त्यावर उतरवले असते व राज्यकर्त्यांना हिंदुद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले असते, पण आता मंदिरे पाडली जात आहेत ती भाजप काळात व सर्व कसे चिडीचूप आहेत, असा सवालही सामनात उपस्थित केला आहे.

शिवाय भाजपचे हिंदुत्व नकली तसेच ढोंगी व स्वार्थी आहे. इतर कोणी हिंदुत्वाचा गजर केला तर त्यांना पैसा व सत्तेच्या बळावर संपवून टाकू ही भाजपची एकंदरीत योजना आहे. संसदेत ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’वर बंदी घालणारे सरकार अयोध्येत धर्मध्वजा फडकवण्याचे ढोंग करते व त्या ढोंगाला अंधभक्त नमस्कार करतात हा चमत्कार देशाला खड्ड्यात घालणारा आहे. ‘वंदे मातरम्’ नाकारणारे एकीकडे अयोध्येत धर्मध्वजा फडकवतात व दुसरीकडे हिंदू धर्माची मंदिरे पाडतात.

धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढले आहे. एकीकडे धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढायचे आणि दुसरीकडे धर्माचेच कारण सांगत नाशकातील सिंहस्थात हजारो वृक्षांची कत्तल करायची, असं म्हणत नाशिकमधील वृक्षतोडीवरून देखील सामनातून भाजपला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी स्वतःला जनतेचा ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात, परंतु जनतेपेक्षा त्यांच्या ‘उद्योगपती मित्रा’चीच सेवा त्यांच्या राजवटीत जास्त होत आहे. नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानाचेही मोदींनी आता ‘सेवातीर्थ’ असे नामकरण केले.

त्याचबरोबर राजभवन आणि राजनिवास यांची नावेही ‘लोकभवन’ तसेच ‘लोकनिवास’ अशी करण्यात आली आहेत. मग आता राज्यपालांचेही ‘भाजपपाल’ असे नामांतर करून टाका. किती हा भंपकपणा! भाजप हा दांभिकपणा सर्वत्र करत आहे. मोगलाईत मंदिरे तोडली म्हणून छाती पिटणारा भाजप बाबराच्याच मार्गाने निघाला आहे. संघ परिवार, भाजप मंदिरे तोडत आहेत व त्यांचे भक्त ‘नमो नमो’च्या नकली हिंदुत्वात गुंग आणि धुंद झाले आहेत. हे नकली हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो, अशा शब्दात ठाकरेंच्या सामनातून भाजपवर जहरी टीका केली आहे. त्यामुळे आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT