

अमृता फडणवीसांनी दावा केला की 2019 विधानसभेच्या मतदानाआधीच उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडतील अशी त्यांना शंका होती.
देवेंद्र फडणवीसांनी मात्र माणुसकीवर आणि विश्वासावर आधारीत राजकारण करत असल्याने त्यांनी असा विचार केला नव्हता.
यापूर्वीही अमृतांनी देवेंद्र फडणवीस हुडी घालून शिंदेंना भेटायला जात होते, असा मोठा खुलासा केला होता.
Mumbai News : राज्याच्या राजकारणात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपच्या पाठित खंजीर खुपल्याची चर्चा सुरू झाली होती. तशा पद्धतीने आरोप देखील भाजपने केले होते. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा असा दावाच केला होता. अशातच आता मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी 2019 चा किस्सा सांगत राजकीय बॉम्ब फोडला आहे. त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होईल अशी पुसटशी शक्यता असल्याची फडणवीस यांना कल्पना दिली होती. तर निकाल आल्यानंतर त्याचपद्धतीने झाल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा 2019 ला नेमक काय झालं यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या असून ठाकरेंच्या शिवसेनेते नेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपनेच आपला शब्द पाळला नसल्याचे शिवसेनेनं वेगळी वाट निवडल्याचे म्हटले आहे.
अमृता फडणवीस यांनी एका खासगी चॅनेलच्या पॉडकास्ट शोच्या पहिल्याच भागात हा राजकीय बॉम्ब फोडत माहिती दिली आहे. याच्या आधी त्यांनी शिवसेनेतल्या बंडावेळी देवेंद्र फडणवीस हुडी घालून शिंदेंना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोट केला होता. आता त्यांनी विधानसभेच्या मतदानाआधीच उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडून जातील. ते काँग्रेस, राष्ट्रवादीशी हाथ मिळवणी करतील अशी शंका व्यक्त केल्याचे म्हटलं आहे. त्यावेळी फडणवीस यांनी आपल्याला तसे वाटत नसून ठाकरेंवर आपला विश्वास असल्याचे म्हटल्याचेही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसेच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळातील फरकही सांगितला. यावेळी त्यांच्याकडून देवेंद्रजी सल्ला घेतात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मला असे काही आठवत नाही की देवेंद्रजींनी माझ्याकडून कधी सल्ला घेतला आहे. पण मी आधीमधी त्यांना सल्ले देत असते. ज्यात एक-दोन सल्ले टू-द-पॉईंट लागले असून ते खरेही ठरले आहेत.
2019 चा किस्सा घ्या त्यावेळी निवडणुकीनंतर भाजपला सुमारे 105–106 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेलाही जवळपास तितक्याच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेना जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेली तर त्यांच्याकडे चांगले नंबर तयार होऊ शकतात अशी शंका माझ्या मनात आली होती. जी मी नंतर देवेंद्रजींना बोलून दाखवली.
शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सरकार बनू शकतील, ठाकरे तिकडे जाऊ शकतात असे मी म्हटले होते. त्यावेळी देवेंद्रजींनी ठामपणे म्हणाले होते की नाही, आमचे दीर्घकालीन मैत्रीचे संबंध शिवसेनेशी आहेत. माझे त्यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मला वाटत नाही असा धोका ते आपल्याला देतील आणि त्यावेळी तसे न होण्याची काही कारणेही पटत होती. मात्र मनात जी शंका होती तीच खरी ठरल्याचेही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बदलावरही भाष्य केलं असून 2019 चा काळ हा ‘इनसिक्युरिटी’ होता. कारण कोणाकडेही पूर्ण बहुमत नव्हते. प्रत्येक पक्षाला एकमेकांची गरज होती. त्या त्रिकोणी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत असत. देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे त्यांचे खूप ऐकत असत. त्यामुळे मर्यादा येत होत्या.
पण आता देवेंद्रजींकडे अधिक स्वातंत्र्य असून ते महाराष्ट्रासाठी त्यांच्या मनात जी ‘मिशन’ आहे, ते पूर्ण करण्याची संधी आता अधिक आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते स्वतःच्या संघटना आणि सरकारमध्ये व्यस्त असल्याने देवेंद्रजींना निर्णयक्षमतेनं काम करण्याचे स्वातंत्र्य जास्त आहे. त्यामुळे ते लोकांमध्ये जास्त नाही तर त्यांच्या मिशनमध्ये त्यांचे लक्ष अधिक केंद्रीत करत आहेत. आणि हाच मोठा बदल आहे.
जे ठरलं ते झालचं नाही... दानवे
यावेळी अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांनी भाजपच्या पाठीत शिवसेनेनं खंजीर खुपसला असा दावा केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी, अमृता वहिनींचे असे मत नसून त्या तशा बोलल्या नाहीत. तर देवेंद्रजी आणि उद्धवजी यांचे संबंध चांगलेच होते. त्यामुळे शंका घेण्यासारखे काहीच कारण नव्हते. पण प्रश्न निवडणूक झाल्यानंतर निर्माण झाला. सत्तेचे अर्धे-अर्धे वाटप करण्याचे सुत्र ठरले होते. जे भारतीय जनता पक्षाने नाकारले, तिथेच हा विषय बिघडला. जागा किती यावरून जर लढत बसलो असतो तर एकमेकांच्या जागांवर पाडा पाडीला सुरुवात झाली असती. त्यामुळेच सत्तेचे 50–50 वाटपाचा फार्म्युला ठरला होता. जो अमित शाह, देवेंद्रजी आणि उद्धवजी यांनी मातोश्रीवर बसून ठरवला होता.
मात्र तो भाजपने पाळला नाही. साहेबांना जर सत्ताच हवी असती तर त्यांनी कधीही राजीनामा दिला नसता किंवा सत्ता सोडली नसती. पण परिस्थितीच अशी निर्माण केली गेली की त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. उद्धवजींच्या मनात असे असते तर त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्रजींना बोलावलं नसतं. यावरुनच, दोन पक्षाचं, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं किती चांगलं होतं हे लक्षात येतं. भाजप शिवसेनेशी ज्या पद्धतीने वागली त्यामुळेच काँग्रेससोबत जाण्याचा विचार केला, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
FAQs :
1. अमृता फडणवीसांनी नेमका कोणता नवीन खुलासा केला?
त्यांनी सांगितले की 2019 आधीच उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडतील अशी त्यांना शंका होती.
2. देवेंद्र फडणवीसांनी त्या शंकेवर काय प्रतिक्रिया दिली होती?
ते माणूसकीवर विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांनी असा विचार केला नाही.
3. हुडी घालून शिंदेंना भेटायला जाण्याचा मुद्दा काय होता?
अमृता फडणवीसांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस शिंदेंशी गुप्त भेटी घ्यायचे.
4. हा खुलासा कुठे केला गेला?
एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत.
5. 2019 च्या राजकीय नाट्यात या खुलाशांचे महत्त्व काय?
हे खुलासे भाजप-शिवसेना तुटीच्या पाठीमागील कारणांची नवी माहिती देतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.