Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Kalyan Politics : कल्याण जिल्हा होणार? भाजप आमदाराच्या मागणीवर श्रीकांत शिंदे बोलले

शर्मिला वाळुंज

Maharashtra Politics Latest News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकार आणि सत्ताधारी आमदार, खासदार अॅक्टिव्ह मोडवर आहेत. विकासकामांची पाहणी आणि भेटीगाठी सुरू आहेत. यात सर्वाधिक चर्चेत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि याचे कारण आहे मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार असल्याने आता आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्हा वेगळा करावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकर निर्णय घ्यावा, असे कथोरे यांनी म्हटले आहे.

कल्याण जिल्हा करण्याच्या मागणीवरून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. आपल्याला त्याबाबत काहीच माहीत नाही. फोन करून त्यांना विचारतो, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी आग्रही असणारे श्रीकांत शिंदे यात खरेच लक्ष घालणार का ? याकडे लक्ष असेल.

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी 2011 मध्ये जिल्ह्याचे त्रिभाजन करून कल्याण वेगळा जिल्हा करावा अशी मागणी पुढे केली होती. आघाडी सरकारच्या काळात 2014 ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हाची निर्मिती झाली. राज्यात महायुतीचे सरकार आले असून उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी त्यावेळी कल्याण जिल्हा स्वतंत्र करण्यात यावा, या मागणीला सहमती दर्शवली होती. तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहमती अद्याप मिळालेली नाही.

कल्याण जिल्हा करण्याबाबत आमदार किसन कथोरे यांच्या मागणीवर खासदार शिंदे यांनी प्रतिक्रया दिली. मी याबाबत ऐकले नाही. फोन करून त्यांना विचारतो, असे ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण जिल्ह्याचा प्रश्न पुढे आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे मागणी?

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा, अशी मागणी आणि यासाठी पाठपुरावा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले आहेत. कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलीस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर आहे.

कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होईल. न्याय मिळेल, असे किसन कथोरे म्हणाले. तसेच समितीने याबाबत अहवाल दिला आहे. त्यामुळे कल्याण जिल्हा झाला पाहिले आणि तो होणारच. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे कथोरे म्हणाले.

'जिल्ह्यावरील ताण होईल कमी'

राज्य शासनाने नेमलेल्या पिंगुळकर समितीनेसुद्धा ही मागणी अतिशय योग्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. ठाणे जिल्ह्याचे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने ठाणे जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. कल्याण जिल्हा स्वतंत्र झाल्यास ठाणे जिल्ह्यावर पडणारा ताण कमी होईल आणि नागरिकांनाही योग्य न्याय देता येणार आहे.

जिल्हा प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कामाची विभागणी व्हावी यासाठी स्वातंत्र्य जिल्हा हा चांगला पर्याय आहे. या स्वतंत्र जिल्ह्यांमुळे काम सहजपणे होईल आणि नागरिकांनाही योग्य वेळ देणे प्रशासनाला शक्य होईल.

- किसन कथोरे, आमदार, भाजप

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT