Amit Satam  Sarkarnama
मुंबई

Assembly Session : ‘अरे अमित, कशाला विरोध करतो? सुनील अन्‌ तुम्ही बसून मिटवा’; बड्या व्यक्तीचा फोन, साटमांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पर्यावरणाच्या बिलावर बोलताना भाजप आमदार अमित साटम यांनी शिवसेनेचं सगळंच बाहेर काढलं. मुंबईच्या गोरेगावमध्ये २०१३ मध्ये एका बिल्डरचा ५०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत आला होता. त्यावेळी मी त्याचा विरोध केला हेाता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एका मोठ्या व्यक्तीचा फोन आला हेाता. अरे अमित, कशाला विरोध करतो. मी सांगतो ना सुनीलला. तुम्ही जाऊन बसा आणि मिटवा, असे त्यांनी मला सांगितले हेाते, असा गौप्यस्फोट आमदार साटम यांनी विधानसभेत केला. त्यामुळे ती व्यक्ती कोण? अशी चर्चा विधीमंडळ परिसरात रंगली हेाती. (Speaking on the environment bill, Amit Satam drew the horoscope of Shiv Sena)

पर्यावरणासंदर्भातील बिलावर बोलत असताना हे बिल आणण्याची आवश्यकता का आहे, असे आमदार अमित साटम (Amit Satam) बोलत होते. त्यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ॲक्झॅटली असा उच्चार केला. त्यावर ॲक्झॅटली असा प्रतिउच्चार करत कारण या अगोदर पूर्वीचे बिल आणले होते म्हणून हे बिल आणले आहे, असा टोमणा साटम यांनी लगावला. एन्व्हार्यमेंटल फ्रेंडली कोण किती होतं आणि सेन्स ऑफ एन्व्हार्यमेंट कोणाची किती आहे, ते मी आता सांगतो, असे सांगून साटम यांनी शिवसेनेची संपूर्ण कुंडलीच मांडली.

ते म्हणाले की, वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ज्ञ असतात, त्या समितीचा प्रमुख हा मुंबई महापालिकेचा आयुक्त असतो. वृक्ष प्राधिकरण समितीत एखादा ठराव पारित झाला तरी तो फायनल नसतो. तो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येतो. त्यावर शिवसेनेचे (Shivsena) (ठाकरे गट) आमदार सुनील प्रभू यांनी हरकत घेतली. ते म्हणाले की ट्री ॲथोरिटेचे प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येत नाहीत. आपण १८२८ चा कायदा तपासा, त्यात असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. वृक्षप्राधिकरण हे स्वायत्त आहे, आयुक्तांकडेच याबाबतचे सर्व निर्णय असतात.

आमदार प्रभू यांच्या हरकतीवर आमदार साटम यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी पुराव्यासह त्याचे स्पष्टीकरण देतो. मी हे बोलणार नव्हतो. पण आता सगळंच बोलतो. वृक्ष प्राधिकरण समितीत पारित झालेला प्रत्येक प्रस्ताव हा मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत येतो, हे सुनील प्रभू तुम्ही विसरला असाल. गोरेगाव परिसरातील एका विकासकाची ५०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये वृक्ष प्राधिकरण समितीत आला होता. त्याला मी आणि मनीषा चौधरी यांनी विरोध करत सभात्याग केला होता. त्यानंतरही तत्कालीन आयुक्तांनी (जे आयुक्त मागच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार होते) तो मंजूर केला हेाता.

तो प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला. त्यावेळी मुंबईचे महापौर हे सुनील प्रभू हेच हेाते. त्या सभेचा इतिवृत्तांत काढा. खोटं बोलत असेल किंवा चुकीचं बोलत असेल तरीही माफी मागेन. त्यावेळी भाजपच्या ३२ नगरसेवकांनी त्या प्रस्तावाला विरोध केला, त्यावेळी महापौर हे प्रभू हेच होते, त्यानंतर आम्ही सभात्याग केला. विरोध करूनही तो प्रस्ताव मंजूर झाला, असेही साटम यांनी स्पष्ट केले.

आम्ही केलेल्या विरोधाच्या दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मला एका मोठ्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी विचारलं की, ‘अरे, अमित काय झालं तुला. काय प्रॉब्लेम आहे. कशाला विरोध करतो. मी सांगतो ना सुनीलला, तुम्ही जाऊन बसा आणि मिटवा.’ आता ते या सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांचं नाव घेत नाही. (या वेळी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये शाब्दीक चकमक झाली)

पर्यावरणाचा त्यांना एवढाच पुळका होता, तर गोरेगावची पाचशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव का पारित झाला. त्यावेळी अनेक प्रकारचे दबाव त्या प्रस्तावाला विरोध करू नका; म्हणून आले होते. पण आम्ही त्यावेळी त्याचा विरोध केला. पुढच्या दिवशी आम्ही घटनास्थळाला भेट दिली होती. त्यामुळे पर्यावरणवाद, बोगस ढोंग २०१९-२०२२ दरम्यान लावलं आहे. म्हणे आम्ही पर्यावरणवादी, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT