Santosh Deshmukh-Suresh Dhas-Dhananjay Munde Sarkarnama
मुंबई

Suresh Dhas's New Blast : सुरेश धसांचा नवा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यास विलंब

Dhananjay Munde's Resignation Delay Issue : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अगोदरच सूतोवाच केले होते. अजितदादांनी सूतोवाच करताच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 07 March : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता. 04 मार्च) राजीनामा दिला. मात्र, मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा अगोदरच द्यायला पाहिजे होता, त्यांना राजीनामा देण्यास विलंब झाल्याची टीका त्यांच्यावर आजही होते आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूतोवाच करूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यास विलंब का झाला?, याबाबत आमदार सुरेश धस यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.

संतोष देशमुख खून प्रकरण भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी लावून धरले होते. त्यांचा पहिल्या दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर रोख होता. याशिवाय, आमदार प्रकाश सोळुंखे यांच्या माध्यमातून आपणच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होतो, असेही आमदार सुरेश धस यांनी या वेळी सांगितले. तसेच, धनंजय मुंडे यांचा राजीनामा न होण्यामागे राष्ट्रवादीतील कोण होते, याबाबतही त्यांनी विधान केले आहे.

सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 2009 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपला नेता काय बोलतोय (धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार यांनी माझ्यावर आरोप झाल्यावर मी राजीनामा दिला होता. त्यामुळे काय करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, अशा आशयाचे विधान केले होते), हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर आपण कोण?

धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या, असे सांगायला कोणीतरी आडवं येत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणीतरी जबाबदार व्यक्ती असेल. ती व्यक्ती कोण आहे?, ते मला माहिती आहे. पण, मी त्यांचं नाव घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक व्यक्ती अशी आहे की, ती धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड प्रेम करते. मुंडे यांच्याबाबत काही निर्णय घ्यायचा म्हटलं की तो राष्ट्रवादीतील जबाबदार नेता आडवा येणार म्हणजे येणार. तोच आताही आडवा आला असेल; म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला उशीर झाला असावा, असा गौप्यस्फोटही सुरेश धस यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अगोदरच सूतोवाच केले होते. अजितदादांनी सूतोवाच करताच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, आता त्यांचा विषय संपला. पण, पंकजा मुंडे यांनीही संतोष देशमुख खून प्रकरणाच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलण्यास एवढा उशीर का केला? असा माझा सवाल आहे.

पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर बोलायलाही उशीर केला आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला जायलाही उशीर केला. आता त्या म्हणतात की संतोष देशमुख यांच्या आईची माफी मागते. पण, हे त्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर म्हणत आहेत, असाही दावा धस यांनी केला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याच्या आड राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणता नेता आला, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT