Sushma Andhare Tweet News : Sarkarnama
मुंबई

Thackeray Faction News : ठाण्याच्या निकालाची चिंता आम्हाला नाही; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

Pankaj Rodekar

Thane Politics News :

श्रीकांत शिंदे यांना कोणी निवडून दिले. प्रकाश सुर्वे यांना आम्ही निवडून दिले. तर उदय सामंतांना मंत्री बनविले. त्यामुळे आम्ही तुम्हाला घडवू शकतो तर खाली सुद्धा उतरवू शकतो, असा इशारा गुरुवारी Shiv Sena उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला नाही तर, हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. आम्ही त्यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. त्यामुळे ठाण्याच्या निकालाची चिंता आम्हाला नाही, असे म्हणून त्यांनी ठाण्याचा गड आम्हीच राखणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

ठाण्याच्या शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा कौल आम्ही घेत आहोत, ते या सत्ताधाऱ्यांना वैतागले आहेत. महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारीवर कोणी बोलत नाही. उलट ठाण्यासह इतर ठिकाणी गुंडगिरी, गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. ठाण्यातील गुन्हेगारीचा आलेख देखील चढा असताना त्यावर काहीच होत नाही. या उलट स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्याच्या विरोधात ही संवाद यात्रा असल्याचेही त्यांनी सांगितले.

'अशी आहे शासन आपल्या दारीची अवस्था'

शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा असल्याचे सांगत, इथे महिलांना घरे मिळालेली नाही, योजना पोहचलेल्या नाहीत, अनेक गांवामध्ये रस्ते, वीज, पाणी नाही, त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशांची लुट असल्याचेही त्या म्हणाल्या.

'रिक्षावाला दाखवून देईल कोणाला जागा'

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना 24 तास बॉडीगार्ड लागतात, त्यात त्यांच्यावर बोलण्याइतके ते काही मोठे झालेले नाहीत. केवळ त्यांच्यावर वरदहस्त असल्यानेच ते बोलत असून त्यांच्या डोक्यावरील हात काढला तर आमचा साधा रिक्षावाला देखील त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे कोणी दिले निमत्रंण'

बारामतीमधील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांना डावललेल्या असल्याच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, त्यासाठी मोठेपणा असावा लागतो, तो मोठेपणा शरद पवार यांनी दाखवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमत्रंण दिल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'कोणाची लावा एसआयटी चौकशी'

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत लावण्यात आलेल्या एसआयटी बाबत त्यांना विचारले. त्यातील वैयक्तीक शिवीगाळीबाबत मी समर्थन करणार नाही. परंतु एसआयटी लावायची असेल तर मग नितेश राणे यांची होणार का चौकशी?, लाठीमाराची होणार का चौकशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इथे निष्ठावान शिवसैनिकांवर दबाव टाकला जात आहे. त्यात रविंद्र वायकर यांच्याबाबतही दबाव टाकला जात आहे. त्यात उद्या ते भाजपमध्ये गेले तर मात्र हिसाब देना पडेगा म्हणणाऱ्या किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागणार असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

'येत्या काळात नगरसेवक देखील पुन्हा येतील'

ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिक कुठेही हललेला नाही. केवळ नगरसेवक गेले. ते देखील केवळ बिले काढण्यासाठी गेले असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्यातच येत्या काळात नगरसेवक देखील पुन्हा येऊ शकतील, असा विश्वासही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT