Eknath shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray faction VS Shivsena : ठाण्यात राजकारणाला जोड 'जल'कारणाची; शिवसेनेच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

Pankaj Rodekar

Thane Political News :

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात कृत्रिम पाणीटंचाईची कायम ओरड असते. अशातच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बेतवडे येथील दोन जलकुंभ 10 ते 12 वर्षांपासून बंद आहेत. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी आवाज उठवला आहे. त्या दोन्ही जलकुंभांना दिव्यातील पाणीटंचाईचे स्मारक घोषित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्या बंद जलकुंभांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करा, अशी उपरोधिक टीका करत ठाकरे गटाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दिवा शहराला पाणीपुरवठा (Water Scarcity in Diva) होण्यासाठी बेतवडे येथे जलकुंभ (टाक्या) 10 ते 12 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत. पण बांधल्यापासून दोन्ही जलकुंभ बंद स्थितीत आहेत. त्यातून दिवा शहराला पाणीपुरवठा केला जात नाही.

दिवा शहरात पाणीपुरवठा होण्यासाठी साठवण टाक्याच उपलब्ध नसल्याने संपूर्ण शहराला समान दाबाने पाणीपुरवठा होत नाही. याला ठाणे महापालिका प्रशासनाचे (Thane Municipal Corportaion) नियोजन आणि तत्कालीन सत्ताधारी जबाबदार असल्याचे टीका करत ज्योती पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

जर या दोन टाक्यांमधून पाणीपुरवठा करायचाच नव्हता तर या टाक्या बांधल्या कशासाठी? असा सवाल ज्योती पाटील यांनी केला आहे. या बंद पाण्याच्या टाक्या सुरू केल्यास त्यातून किमान दिवा शहरातील काही भागाला मुबलक स्वरुपात समान दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अस्तित्वात असणारे जलकुंभ बंद ठेवणे हे कोणते शहाणपण, असा सवाल यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी या जलकुंभांवर करण्यात आलेला खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही ज्योती पाटील यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या दोन टाक्या दहा ते बारा वर्षांपासून बंद आहेत. तरीही जलकुंभांच्या बाह्यभागावर पाण्यात मासे पोहत असल्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे, ही बाब हास्यास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. दिवा शहरात भीषण पाणीटंचाई आहे. टँकर दिवा शहराच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतात.

दिवेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दिवा शहरातील भीषण पाणीटंचाईचे स्मारक म्हणून या दोन्ही बंद जलकुंभांची घोषणा करावी तसेत दोन्ही बंद जलकुंभांची गिनीज रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करावी, अशी उपरोधिक मागणी करून ठाकरे गटाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT