Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

SIT Report : ठाणे, नांदेडमधील 53 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Avinash Chandane

Hospital Death News : हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने अनेक एसआयटी स्थापन केल्या आहेत. यापूर्वीही अनेक चौकशी समित्यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, पण या समित्यांच्या अहवालांचं काय होतं, हे अजून गुलदस्त्यात आहे. याबाबत यंदाच्या तीन महत्त्वाच्या दुर्घटनांचा अगदी आवर्जून उल्लेख करावा लागेल. समित्या स्थापन झाल्या, पण अजून अहवाल जाहीर झालेला नाही. ही बाब सत्ताधारी विसरले आणि विरोधकांनीही याबाबत कधी सरकारला विचारल्याचं दिसलं नाही. त्यामुळे समित्या म्हणजे गंभीर विषयाला बगल देण्याचं हत्यार आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

ठाणे रुग्णालयातील 18 बळी

यंदा 12 ऑगस्टच्या रात्री ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली. 12 तासांत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ही दुर्घटना घडल्यानं राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केली.

राज्य आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीत आरोग्य संचालक, ठाणे महापालिका आयुक्त, ठाण्याचे जिल्हाधिकारी, जेजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश करण्यात आला होता. या दुर्घटनेला चार महिने झाले आणि समिती नेमूनही चार महिने झाले. पण अजूनही समितीचा अहवाल जाहीर झालेला नाही.

या समितीच्या अहवालानंतर 18 रुग्णांचे बळी कशामुळे गेले, हे समोर आले असते. पण यानंतर रुग्णालयात बळी जाण्याच्या आणखी मोठ्या दुर्घटना नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्या. कदाचित ठाण्याच्या अहवालानंतर पुढील दुर्घटना टळू शकल्या असत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेडच्या रुग्णालयात 35 मृत्यू

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाले होते. त्यात 12 नवजात बालकांचा समावेश होता. 2 ऑक्टोबरला ही दु्र्घटना घडली. त्यानंतर 3 ऑक्टोबरला आणखी 11 रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर तीन डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मु्श्रीफ यांनी केली. या समितीचा अहवाल दोन महिने झाले तरी महाराष्ट्रासमोर आलेला नाही. नांदेडमधील मत्युकांडाची दखल खुद्द मुंबई उच्च न्यायालयानंही घेतली होती.

घाटी रुग्णालयात नांदेडची पुनरावृत्ती

3 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दोन बालकांसह 10 रुग्णांचा मृत्यू. नांदेड आणि घाटी रुग्णालयांतील लागोपाठ मृत्युकांडांमुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली. सरकारनं पुन्हा हालचाल केली. पण अहवाल काही पुढे आला नाही.

राज्यातील तीन रुग्णालयांतील मृत्यूच्या घटनांनी देशात खळबळ उडाली होती, पण ना ठाण्यातील दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर आला ना नांदेडमधील अहवाल. त्यामुळे नुसच्या चौकशी समिती नेमून काय साध्य होणार, हाच खरा प्रश्न आहे.

या हिवाळी अधिवेशनातही सरकारने अनेक चौकशी समितींची (एसआयटी) घोषणा केली आहे.

12 डिसेंबर 2023

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआटी

15 डिसेंबर 2023 - 3 एसआयटी

1. मराठा आंदोलनात बीड-माजलगावमध्ये झालेली जाळपोळ

2. ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे सलिम कुत्ता कनेक्शन

3. ठाणे-वागळे इस्टेटमधील 16 हजार 180 कोटींचा पेमेंट गेट-वे आणि पे-आऊट घोटाळा

आता या हिवाळी अधिवेशनातील नियुक्त चौकशी समित्यांचा अहवाल जनतेसमोर भविष्यात येणार का आणि ठाणे-नांदेडमधील रुग्णालयांतील चौकशी समित्यांच्या अहवालात काय दडलंय का, हे कधी स्पष्ट होणार, हे या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळेल का, हे पाहावं लागेल.

(Edited by - Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT