NCP-SP leader Manoj Pradhan criticises Mahayuti MLAs over the Thane Metro project Sarkarnama
मुंबई

Thane Metro Project : रिंग मेट्रो भातुकलीचा खेळ आहे का? शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; मनोज प्रधानांचा महायुतीच्या आमदारांवर घणाघात

Thane Ring Metro 12200 crore project: हा प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी 2035 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही, असा दावा देखील मनोज प्रधान यांनी केला आहे.

राहुल क्षीरसागर

Thane Ring Metro project opposition: ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला आहे. सोशल मीडियावर १०० टक्के लोक विरोध करीत आहेत, असे असताना, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे तीन आमदार, "हा प्रकल्प फेस्टिव्हल होणार नाही म्हणून पुढे सरकवा; सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून 200 मीटर पुढे न्या; कळवा- मुंब्रा येथे प्रकल्प न्या", असे सल्ले देत आहेत.

हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिले, तर सर्कसचीच अपेक्षा करा!, असा टोलाही प्रधान यांनी लगावला आहे.

आमदारांनी या प्रकल्पाबाबत केलेल्या सूचनांवर टीका करताना प्रधान यांनी सांगितले की, रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आला आहे. ​१२,२०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, आपला पहिला प्रश्न आहे की, हा प्रकल्प मागितला कुणी? ​ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे?

पुढे बोलताना ते म्हणाले, 'सोशल मीडियावर बघितलं, तर १०० पैकी १०० कमेंट्स ह्या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचे कारण आहे की, मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच गेले १० वर्ष चालू करू शकलेले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय. सुरूवातीलाच १,००० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा, पण आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच बोलायचे नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करीत असले तरी एका सोसायटीचे लोक, आमच्या समोर स्टेशन नको, २०० मीटर पुढे स्टेशन घेऊन जा. दुसरे सोसायटी वाले सांगतात, या रस्त्यावर नका घेऊ, मागच्या रस्त्यावर नेऊन घ्या, असे म्हणत आहेत.'

उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण...

हा प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी 2035 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत. कारण, त्यांनी नागरिकांच्या सुचना - हरकती - सल्ले घेऊ, असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच आहे. पण सुचना, हरकती येण्याआधीच जर कामे सुरू असतील तर फायदा कसा काय होणार?

त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सुचना स्वीकारून त्यावर साधक - बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचे कामच सुरू करू येऊ नये, तसेच मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच पूर्ण कार्यन्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचारही करू नये, अशी आमची मागणी असल्याचेही प्रधान यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT