Thane Municipal Corporation Sarkarnama
मुंबई

Thane Mahapalika : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील 200 कोटींची कामे करणाऱ्या कंपनीची होणार चौकशी; काय आहे कारण ?

Pankaj Rodekar

Thane Political News : चिपळूण येथे बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळल्याची घटना असो किंवा भिवंडीमधील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम यामुळे गुन्हा दाखल असलेल्या ईगल इन्फ्रा लि. कंपनीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेच्या भुयारी गटार योजना टप्पा क्र. 4 चे अंदाजे 200 कोटींचे काम केलेले आहे.

त्या कामाचे आयआयटी मुंबईमार्फत परीक्षण व्हावे, अशी मागणी मनसेने केली होती. त्यानुसार याबाबत आता महापालिका प्रशासनाने पावलं उचलल्याने या कंपनीचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात त्या कंपनीवर गुन्हा दाखल होत की नाही, हेच पाहावे लागणार आहे.

चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या वादग्रस्त कंपनीला भिवंडी निजामपूर महापालिकेने रस्ते पुनर्बांधणी कामे दिली होती. भिवंडीतील नगरसेवक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांच्या मागणीनंतर तत्कालीन आयुक्तांनी पवईच्या आयआयटी संस्थेकडून या कामाच्या दर्जाचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. आयआयटी मुंबईचा परीक्षणानुसार या कामामध्ये गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याचा अहवाल उपायुक्तांनी आयुक्तांना सादर केला होता.

भिवंडी महापालिकेच्या (Bhivandi) उपायुक्तांनी ईगल इन्फ्रा व तांत्रिक तपासणी करणाऱ्या इंडिया रजिस्टर ऑफ शिपिंग (इरिस) यांनी संगनमताने महापालिकेचे 3 कोटी 17 लाख 93 हजार रुपये इतकी रक्कम अतिप्रदान करून घेतली म्हणून 2018 मध्ये 420, 197, 34 कलम अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

दरम्यान, या वादग्रस्त कंपनीने ठाणे शहरात केलेल्या कामाचे आयआयटीमार्फत परीक्षण व्हावे, अशी मागणी मनसेने 31 ऑक्टोबर 2023 केली होती. त्याच्यावर नगर अभियंता यांनी मनसेचे संदीप पाचंगे यांना 10 जानेवारी 2024 ला आयआयटी मुंबई संस्थेच्या वतीने लेखापरीक्षण करणार असल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे.

या ईगल इन्फ्रा इंडिया लि. कंपनीच्या कामांची तृतीयपंथीय तांत्रिक चौकशी होणार आहे. मात्र आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बिले काढणाऱ्यांवर काय कारवाई होते, तेही लवकरच समोर येईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसेची मागणी काय?

ईगल इन्फ्रा इंडिया लि. या वादग्रस्त कंपनीवर भिवंडी, उल्हासनगर, चिपळूण शहरांत तक्रार दाखल असल्यामुळे याप्रकरणी आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी. भुयारी गटार योजना टप्पा क्र. 4 चे कामाचे आयआयटी मुंबईमार्फत लेखापरीक्षण अहवालानुसार कठोर कारवाईचे आदेश द्यावेत. आयुक्तांच्या परिपत्रकाचा अवमान करणाऱ्या, तसेच आयआयटी परीक्षण न करता कोट्यवधीची बिले देणाऱ्या मलनिस्सारण विभागातील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT