Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Radhakrishana Vikhe Patil: अजित पवारांच्या सत्तेतील 'एन्ट्री'चा पहिला फटका राधाकृष्ण विखेंनाच, 'या' समितीतून वगळले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर अजित पवारांनी थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. आणि त्याचदिवशी त्यांनी काही आमदारांसह शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

आता अजित पवार गटाच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे शिंदे गटासोबत भाजपचीही मोठी कोंडी झाली आहे. याचाच फटका थेट राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखेंना बसला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना मोठा धक्का दिला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe Patil) मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून वगळण्यात आले आहे. त्यांच्याजागी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री उदय सामंत, अतुल सावे, दादा भुसेंचा यांचाही समावेश आहे.

समितीतून वगळल्यानंतर विखे पाटील म्हणाले...

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून वगळल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील म्हणाले, 'सर्व गोष्टींचा विचार त्यांना करावा लागतो. आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस त्या समितीमध्ये आहेत. त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला असेल. तसेच ज्या समितीमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आहेत. त्यामुळे मी त्या समितीत असलो, नसलो फरक पडत नाही असेही ते त्यांनी सांगितले.

'' फडणवीस जो निर्णय घेतात तो...''

देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतात तो विचारपूर्वक घेतात. समन्वय राहावा म्हणून कदाचित त्यांनी निर्णय घेतला असावा. त्या समितीत स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे मी असो किंवा नसो काही फरक पडत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

...तर फडणवीसांचा अजितदादांना धक्का !

उपमुख्यमंत्री अजित पवारां(Ajit Pawar)नी साखर कारखान्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे भाजप नेत्यांच्या कारखान्यांची मोठी कोंडी झाली होती. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) मंजूर केलेले ५४९.५४ कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल तर कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे आणि कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा तसेच गहाणखत व अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी लादत कारखानदारांची कोंडी करण्याचा निर्णय आठच दिवसात मागे घेतला.

भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट अन् चक्र वेगाने फिरली...

अजितदादांनी लादलेल्या नव्या अटीमुळे हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, राहुल कुल आणि धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांची कोडी होणार होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीसांनी हा निर्णय घेत अजितदादांना धक्का दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT