Maharashtra BJP Sarkarnama
मुंबई

BJP : 'महाराष्ट्रात कुणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, तर...' दिल्लीतील नाराज वरिष्ठांचा रोख नेमका कुणाकडे?

Jagdish Patil

Maharashtra BJP : कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत जाण्याचा रस्ता हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. कारण इतर राज्याच्या तुलनेत या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे या दोन राज्यांतील खासदारांचा आकडा सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावतो.

मात्र, याच दोन राज्यांमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे साहजिकच भाजपचे वरिष्ठ नेते या राज्यातील नेतृत्वावर नाराज आहेत. अशातच आता कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवा, अशा सूचना भाजपच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केलेल्या भाजपच्या पदरी केवळ 9 जागा आल्या. त्यामुळे राज्यातील या पराभवाची कारणमिमांसा वरिष्ठ पातळीवर सुरु केली आहे. अशातच मंगळवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्यातील भाजप कोअर कमिटीची दिल्लीत महत्वाची बैठक घेण्यात आली होती. यावेळी वरिष्ठांनी कोअर कमिटीला महत्त्वाच्या सूचना केल्याचं सांगितलं जात आहे.

कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे. महाविकास आघाडीला थांबवायचं असेल, तर पक्षाला एकत्रितपणे काम करायला पाहिजे. यासाठी राज्यातील भाजपच्या सर्वच जुन्या नेत्यांना सक्रीय करायला हवं, अशा सूचना दिल्लीश्वरांनी राज्यातील भाजप नेत्यांना केल्या आहेत.

तसंच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, आत्तापासून उमेदवारांना तयारी सुरू करायला सांगा. लोकसभेला ज्या चुका झाल्या, त्या विधानसभेला होऊ देऊ नका, महाराष्ट्रात भाजपची (BJP) सत्ता आणायचीच आहे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

सोशल मीडियाचा वापरा वाढवा

नेत्यांच्या कामगिरीसह महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडियावरही केंद्रीय नेतृत्व नाराज आहे. यावरुनच कालच्या बैठकीत सोशल मीडियावरील प्रचारासंदर्भातही चर्चा झाली. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले जातात, त्याला उत्तर देण्यात भाजपचे नेते कमी का पडले? असा सवाल करत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोशल मीडियाचा वापर वाढवा असंही सांगण्यात आलं.

दरम्यान, दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, "लोकसभेच्या निकालावर सविस्तर चर्चा झाली. या निवडणुकीत कुठे आणि कशी मतं मिळाली, कुठे चांगलं यश मिळालं आणि कुठे कमी मतं मिळाली? त्याची कारण काय होती? निवडणुकीवर कोणत्या मुद्द्यांचा प्रभाव होता, या सर्व गोष्टींवर चर्चा बैठकीत झाली. तसंच येत्या विधानसभेच्या रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा झाली."

नेतृत्वात बदल नाही

लोकसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्यातील नेतृत्वात बदल केला जाणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, राज्यातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, महायुती संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT