Mantralaya News Sarkarnama
मुंबई

Mantralaya News : मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न अन् लाच देण्याच्या घटनांवर सरकारचा जालीम उपाय

Amol Jaybhaye

Mumbai News : मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यासोबतच मंत्रालयात येऊन लाच देण्याच्या घटनांना रोखण्यासाठी राज्य सरकारने जालीम उपाय काढला आहे. मंत्रालयात येणार्यांवर ड्रोनने नजर ठेवली जाणार असून १० हजारपेक्षा जास्त रक्कम घेऊन येणाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश रोखला जाणार आहे. त्यामुळे जर एखाद्याच्या खिशात १० हजारपेक्षा अधिक असलेली रक्कम सुरक्षारक्षक उपलब्ध करुन देतील त्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची तयारी असेल तर मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे.

मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना प्रवेशासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पास देण्यात येणार आहेत. प्रवेश करण्यासाठी कलर कोडेड प्रवेशपास दिला जाणार आहे. ज्यामुळे ज्या मजल्यावर जायचे असेल त्या व्यतिरिक्त इतर कुठेही जाता येणार नाही. केंद्र सरकारने (Central Government) अशा प्रकारची यंत्रणा वापरलेली आहे. ती मंत्रालयातही सुरू केली जाणार आहे.

तसेच त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. लाचखोरी रोखण्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम असेल तर मंत्रालयात प्रवेशच दिला जाणार नाही. मात्र, अधिकची रक्कम ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, अशा मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णयच गृहविभागाकडून जारी करण्यात आली आहे.

मंत्रालयात दररोज सरासरी तीन ते साडेतीन हजार अभ्यांगत रोज येत असतात. कॅबिनेटच्या दिवशी ही गर्दी तर पाच साडेपाच हजारांपेक्षा जास्तीची गर्दी मंत्रालयात होत असते. त्यामुळे दर दिवशी किती जणांना पास देता येईल याची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे. तसेच मंत्रालयात एखादी व्यक्ती नियमित येत असेल तर ती का येत आहे याचा अहवाल दर महिन्याला तयार केला जाणार आहे. सव्वा सहाच्या पुढे मंत्रालयात अभ्यांगत थांबणार नाही, याची पाहणी सुरक्षा रक्षक करणार आहेत.

मध्यवर्ती प्रांगणातील त्रिमुर्ती शिल्पाजवळ तसेच गार्डनमध्ये सेल्फी काढत बसण्याचे प्रकारही सध्या वाढले आहेत. मंत्रालय सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीस (Police) यंत्रणेवर यामुळे मोठा ताण पडत असतो. हे रोखण्यासाठी पत्र घेऊन येणाऱ्यांना स्वतंत्र व्यवस्था मंत्रालय प्रवेशद्वाराशेजारीच करण्यात आली. मात्र, त्यानंतरही ही गर्दी काही कमी झालेली नाही. आता गृहविभागाने मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यातील काही नियम तात्काळ अंमलात येत असून काही नियम येत्या काही दिवसांत अंमलात येणार आहेत.

वाहनांसाठी आरएफआयडी टॅग, खाद्यपदार्थ आणण्यावरही बंदी

वेबपोर्टल व मोबाईल ॲपद्वारे अभ्यांगतांची नोंदणी होणार आहे. ज्या विभागात जायचेय त्या मजल्यावरच प्रवेश देण्यात येईल. इतर कुठेही जायची अनुमती त्यांना नसेल. प्रवेश करणाऱ्या वाहनांना आरएफआयडी टॅग लावण्यात येईल. संध्याकाळी सव्वासहानंतर पोलीस संपूर्ण मंत्रालय चेक करून अभ्यागत थांबले असल्यास त्यांना बाहेर काढतील. बाहेरील खाद्यपदार्थांवर देखील बंदी घालण्यात येणार आहे. अपवाद फक्त कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या डब्यांचा असणार आहे.

उड्या रोखण्यासाठी प्रत्येक मजल्याला जाळ्या

मंत्रालयात (Mantralaya) गच्चीवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येतील. उड्या मारणे रोखण्यासाठी मजल्यांवर अदृष्य स्टील रोप्स लावण्यात येणार आहेत. या जाळ्यांमुळे मजल्यावरून साधे खाली डोकावताही येणार नाही. मंत्रालयाच्या आवारात असणाऱ्या भटक्या कुत्री मांजरांनाही आता बाहेर काढले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेला या भटक्या प्राण्यांचा प्रतिबंध करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रालयाशेजारी दोन पेट्रोलपंप आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचेही फायर ऑडिट करण्यात येणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT