Jayant Patil - Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil Matoshree Visit : मोठी बातमी ! अमित शाहांच्या भेटीची चर्चा थांबत नाही, तोच जयंत पाटील अचानक 'मातोश्री'वर !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कधी ते अजित पवारांच्या गटासोबत जाणार तर कधी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरु आहे. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात भेट झाल्याच्या चर्चा समोर आली आणि एकच खळबळ उडाली.

अखेर जयंत पाटलां(Jayant Patil) ना स्वत: माध्यमांसमोर येऊन शाह आणि आपली कुठलीही भेट झाली नसल्याचा खुलासा करावा लागला. मात्र, या भेटीच्या चर्चांची धूळ खाली बसत नाही तोच जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेतली आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुण्याच्या दौऱ्यावेळी जयंत पाटील - अमित शाह यांची भेट झाल्याची चर्चा रंगली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्येच पाटील यांची शाह यांच्याशी भेट घडवून आणली असल्याचे बोलले जात होते. तसेच या बैठकीला हे चौघेच नेते होते. इतर कोणताही नेता नव्हता. एक तासभर या चारही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

विशेष म्हणजे या भेटीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली होती. मात्र, जयंत पाटलांसह देवेंद्र फडणवीसांनीही अमित शाह भेटीचे वृत्त फेटाळले. मात्र, त्यानंतर जयंत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP )चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी संध्याकाळी अचानक मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उध्दव ठाकरे आणि त्यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली. या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, ही भेट मुंबईत विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीबाबत असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

मुंबईत विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला पार पडणार आहे. बैठकीचे यजमानपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thakceray) भूषविणार आहेत. या बैठकीच्या आयोजनाबाबत आघाडीच्या नेत्यांची बैठक शनिवारी झाली. त्यात इंडियाच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात जयंत पाटील हे मातोश्रीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे.

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस विमानतळानजीक ‘हयात’ हॉटेलमध्ये ही परिषद होणार आहे. त्यास विविध पक्षांचे सुमारे १५० नेते उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

ठाकरेंसोबतच्या भेटीत काय घडलं? जयंत पाटील म्हणाले...

मुंबईत विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला पार पडणार आहे. याच बैठकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेट घेतली असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयोजक असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील शरद पवार गट सहसंयोजकाच्या भूमिकेत असेल. पाटणा आणि बंगळूरुनंतर ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. पाटणा व बंगळूरुमध्ये ‘इंडिया’मधील घटक पक्षांचे सरकार होते. मुंबईत बैठक होत असली तरी राज्यात आमचे सरकार नाही. त्यामुळे ही बैठक आमच्यासाठी आव्हान आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यावर राज्य सरकारशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT